धारूर : आरणवाडी साठवण तलावानजीक एमएसआरडीने केलेला पर्यायी रस्ता पाण्यात जात असल्याने पाटबंधारे विभागाने तलावातील पाणी साठा कमी करण्यासाठी सांडवा फोडण्याचे ठरविले. मात्र, या तलावाखालील पाच गावच्या लोकांनी विरोध केला. इतर पर्यायी मार्ग काढून पाणी कमी करावे, मात्र सांडवा फोडू नये अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. दरम्यान, शनिवारी या तलावास महसूल व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र निर्णय होऊ शकला नाही.
अनेक वर्षांपासून रखडलेला आरणवाडी साठवण तलाव यावर्षी तब्बल सतरा वर्षांनंतर पूर्ण झाला. या तलावात यंदा चांगल्या पावसामुळे ९० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा झाला. तलावाच्या बाजूने खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्गाचा पर्यायी रस्ता करण्यात आला. मात्र हे काम एमएसआरडीने संथगतीने व अर्धवट केले. उंचीही वाढवली नाही. दरम्यान, तलावात पाणी साठा वाढल्याचे लक्षात आल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलावात ८५ टक्केपेक्षा जास्त पाणी साठा ठेवणे धोकादायक असल्यामुळे सांडवा फोडण्याचा घाट घातला. मात्र, त्यास चोरांबा, आरणवाडी, थेटेगव्हाण, ढगेवाडी, पहाडीपारगाव येथील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे शनिवारी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार वंदना शिडोळकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यू. व्ही. वानखेडे, उपअभियंता हत्ते, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी तलावावर जाऊन परिस्थिती पाहिली व ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नाही. यावेळी बाजार समितीचे सभापती सुनील शिनगारे, बालासाहेब चव्हाण, सदाशिव शिनगारे, भागवत शिनगारे, लहू फुटाणे, बंजरंग माने, सुरेश अंडील आदींसह नागरिक उपस्थित होते.
एमएसआरडी अभियंत्याची तहसीलदारांना अरेरावी
तलावाचा सांडवा फोडण्याच्या हालचाली सुरू असताना शनिवारी सकाळी तहसीलदारांनी तलाव आणि रस्ता कामाची पाहणी केली. त्यानंतर एमएसआरडीच्या उप अभियंत्यांना चौकशीसाठी फोन केला असता त्यांनी तहसीलदारांशी उद्धट वर्तणूक केली. या प्रकरणी पाहणी अहवाल व नागरिकांचे म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.
जलसमाधी घेऊ, पण सांडवा फोडू देणार नाही
आरणवाडी साठवण तलावाच्या शेजारील रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाकण्यासाठी सांडवा फोडण्याचा घाट घातला जात आहे. या परिसराचे अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. सांडवा फोडणे गरजेचे नाही. प्रसंगी जलसमाधी घेऊ पण आम्ही सांडवा फोडू देणार नाहीत, असे चोरांबा येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाण म्हणाले.