बीड : महिनाभर खंड दिल्यानंतर १६ ऑगस्ट रोजी रात्री जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील २४ तासात गेवराई, बीड, पाटोदा व शिरूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. इतरत्र मात्र अल्प पावसाची नोंद आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या. जून व जुलैमध्ये जिल्ह्यात ३९१.९ मिमी. पाऊस झाला. मात्र, जुलैच्या काही दिवसच पाऊस झाला होता. तब्बल एक महिना पावसाने दडी मारल्याने प्रामुख्याने सोयाबीनसह अन्य पिके जळण्याच्या मार्गावर होती. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून होता. १७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ २९.२ मिमी. पाऊस नोंदला आहे. १६ ऑगस्ट रोजी रात्री बीड, गेवराई, पाटोदा व शिरूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना बुस्टर डोस मिळाला असला तरी इतर तालुक्यांमध्ये परिस्थिती अद्याप चिंताजनक आहे.
------
१७ मे रोजी नोंदलेला पाऊस
बीड २०.५ मिमी., पाटोदा १९.४, आष्टी ३.७, गेवराई ५५.४, माजलगाव ३.५, अंबाजोगाई २.५, केज १.६, परळी २.२, धारूर १.०, वडवणी २.५ आणि शिरूर कासार तालुक्यात १६ मिमी.
-----------
जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ५६६.१ मिमी इतके आहे. आतापर्यंत ४२१ मिमी. पाऊस नोंदला असला तरी खंड पडल्याने उडीद, मूग, सोयाबीन, कापूस आदी पिकांना फटका बसला आहे.
-----
जिल्ह्यात आतापर्यंत झालेला एकूण पाऊस
बीड ३११ मिमी., पाटोदा ३३२, आष्टी २८५, गेवराई ४३१, माजलगाव ५०६, अंबाजोगाई ६०७, केज ४२५.४, परळी ५६८.४, धारूर ५५७.५, वडवणी ४८२.९ आणि शिरूर कासार तालुक्यात ३१९ मिमी.
-----------