हमरस्त्यावर मोकाट जनावरांची वर्दळ
शिरूर कासार : मोकाट शेळ्यांचा उपद्रव कमी झाला असला तरी अजूनही मोकाट जनावरांची हमरस्त्यावरील वर्दळ मात्र कमी झालेली नाही. ही जनावरं रस्त्याच्या मधेच आपली बैठक मारतात तर कधी सुसाट धावतात, त्यांची लागलेली टक्करदेखील चालणाऱ्याला इजा करण्याची भीती असते. गांभिर्याने यावर विचार व्हावा, अशी सर्वसामान्य ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
सूर्यफुलाचे तालुक्यात दर्शनच नाही
शिरूर कासार : तालुक्यात पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाचा पेरा जवळपास पन्नास हजार हेक्टरवर केला गेला. त्यात कापूस, सोयाबीन, तूर, बाजरीसह अन्य सर्वच वान दिसत असले तरी सूर्यफुलाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने सूर्यफुलाचे दर्शनसुद्धा होत नाही.
अतिवृष्टीने पिके पडू लागली पिवळी
शिरूर कासार : तालुक्यात पाऊस वेळेवर पडल्याने यावर्षी सोयाबीन पेरा मोठ्या प्रमाणावर झाला असून, मेहनत झाल्यानंतर हिरवेगार दिसत होते; मात्र गेली सहा-सात दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाला पिवळकिची बाधा जडली आहे. पावसाने उघडीप व कडक उन्हाची गरज असल्याचे शेतकरी सांगतात.
सोयाबीन संरक्षक म्हणून एरंडी बिया
शिरूर कासार : यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीन पेरा मोठ्या प्रमाणावर केला गेला. अळी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोयाबीन भोवताली एरंड बिया लावल्यास ते संरक्षक म्हणून चांगले उपयोगी पडणार असल्याचा सल्ला कृषी विभागाकडून केला जात आहे. कपाशीभोवतीसुद्धा एरंडी बिया लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जुन्या घराची डागडुजी
शिरूर कासार : सध्या रोजच पडत असलेल्या पावसामुळे जुनाट घरांना गळती लागत आहे. शिवाय भिंतीची झालेली पडझड दुरुस्ती केली जात आहे. गळती थांबवण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून मेनकापड, ताडपत्री झाकली जाऊन तूर्तास सोय केली जात असल्याचे दिसून येते.
सायंकाळची शतपावली
शिरूर कासार : घरची सगळी आवराआवर झाली आणि जेवण झाल्यानंतर सायंकाळी शतपावलीला पसंती दिली जात असून, जेवढे जमेल तेवढी पायपीट करण्यात महिलांचादेखील सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
बांधकामाचा धडाका, विटांचे भाव दुप्पट
शिरूर कासार : तालुक्यात सध्या बांधकामाचा धडाका सुरू असल्याने भाजलेल्या विटाला मोठी मागणी आहे. परिणामी, विटांचे हजारी भाव दीडपट दुप्पट झाले असल्याचे बांधकाम करणारे व व्यावसायिक बोलत आहे.
दुभाजक सुशोभिकरण करण्याची मागणी
अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यावर असलेल्या दुभाजकाची दुरुस्ती करून त्याला रंग देण्यात यावा, तसेच या दुभाजकांमध्ये येत्या पावसाळ्यात शोभिवंत फुलांची झाडे लावल्यास शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. यासाठी नगरपालिकेने आतापासून नियोजन करावे, अशी मागणी रणजित डांगे यांनी केली आहे.
बाजारपेठेत होतेय नियमांचे उल्लंघन
अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांपासून अंबाजोगाई तालुक्यात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे; मात्र कोरोना कायमस्वरूपी गेला, या भावनेतून नागरिक बाजारपेठेत आता मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. प्रशासनानेही यासंदर्भात ठोस उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी केली आहे.