लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : कोरडवाहू, बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करावा. ही पद्धती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे, असे प्रतिपादन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डाॅ. वासुदेव नारखेडे यांनी केले.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव व किसान ॲपच्या माध्यमातून २७ मे रोजी ‘कोरडवाहू आणि बागायती करिता एकात्मिक शेती पद्धती ’ या विषयावर शुक्रवारी एकदिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी डॉ. देवराव देवसरकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सय्यद इस्माईल, प्रा. किशोर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. पशुपालन, चारापिके त्याचे वाण, शेळीपालन, मत्स्यशेती, कुकुटपालन,मधुमक्षिका पालन, तुती लागवड इत्यादी शेतीपूरक व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे? याविषयी माहिती डॉ. नारखेडे यांनी दिली.
डॉ.सय्यद इस्माईल यांनी शेतकऱ्यांनी शेती पूरक इतर व्यवसाय करावे. जेणे करून आर्थिक उलाढाल वाढेल असा सल्ला दिला. अध्यक्षीय मनोगतात डॉ. देवसरकर यांनी आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीला जोडधंद्यांची नितांत गरज आहे असे सांगितले. प्रा. किशोर जगताप यांनी उपस्थित मान्यवरांचे व सहभागी शेतकऱ्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक डॉ. हनुमान गरुड यांनी केले. आभार दीपक इंगळे यांनी मानले.