तत्काळ अडचणी सोडवून प्रकल्पाला गती द्यावी : रेल्वे व जिल्हा प्रशासनाची प्रीतम मुंडे यांनी घेतली बैठक
बीड : नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने तीनशे अठ्ठेचाळीस कोटींपैकी दीडशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या रेल्वे मार्गासंदर्भात ऑगस्ट महिन्यात झालेल्या ऑनलाइन बैठकीत निधी मिळवून देण्यासाठी केंद्राकडे खासदार मुंडे यांनी पाठपुरावा केला होता. निधी मिळाल्यानंतर खा. मुंडे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील रेल्वे व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाला गती देण्यासंदर्भात सूचना केल्या.
बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग वेळेत पूर्ण करण्यासाठी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक घेतली. रेल्वे मार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच भूसंपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी आढावा घेतला. भूसंपादन, रेल्वे मार्गात येणारे विजेचे खांब आणि वृक्षांचा अडथळा दूर करण्यावरदेखील त्यांनी चर्चा केली. दरम्यान, भूसंपादनामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी रेल्वे विभागाने त्या त्या क्षेत्रात कॅम्प घ्यावा व भूसंपादनाशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशा सूचनादेखील खा. मुंडे यांनी यावेळी केल्या. भूसंपादन आणि प्रकल्पातील इतर अडचणी सोडविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा दर महिन्याला आढावा आपल्याला सादर करावा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीस जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड, नामदेव टिळेकर, नम्रता चाटे यांच्यासह इतर अधिकारी होते.