रेल्वेच्या कामाला गती
कडा : आष्टी तालुक्यातील खुंटफळ ते आष्टी दरम्यान बहुसंख्य ठिकाणी रेल्वे पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी किरकोळ भूसंपादनाचे काम रखडले आहे. ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकचे काम सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी कामाला गती असल्याचे दिसून येत आहे.
....
जुन्या तलावांची गळती थांबवा
बीड : जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाझर तलाव आहेत. या तलावात गाळ साठला आहे, तर अनेक तलावांच्या भिंतीचा काही भाग जुनाट झाला आहे. पावसाळ्यात अनेक तलावांना गळती लागते. तलाव पूर्ण भरला तरी दोन महिन्यांत तलावातील पाणी संपते. तरी जुन्या तलावांची दुरुस्तीची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
.....
पाऊस लांबल्याने पिके सुकू लागली
पाटोदा : तालुक्यातील धनगर जवळका परिसरात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. परंतु गेल्या दहा, बारा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके सुकू लागली आहेत. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
.......
म्हसोबावाडी फाट्यावर पेट्रोल पंपाची मागणी
धानोरा : कल्याण-नगर-बीड मार्गावरील म्हसोबावाडी दरम्यान पेट्रोल पंपाची मागणी होत आहे. धामणगाव येथे पंप आहे. परंतु, धानोरा-सावरगाव-पाथर्डी येथे जाण्यासाठी जवळपास पेट्रोल पंप नाही. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांना पेट्रोल संपल्यानंतर मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते. यामुळे म्हसोबावाडी दरम्यान पेट्रोल पंप झाल्यास गैरसोय दूर होईल.
.......
पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
आष्टी : तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. १५ जुलै ही विमा भरण्याची अंतिम मुदत आहे. यामुळे विमा भरण्यासाठी सातबारा, आठ अ साठी शेतकरी तलाठ्यांकडे विचारणा करीत आहेत.
.....
तलावांनी गाठला तळ
आष्टी : तालुक्यातील मेहेकरी, दादेगाव, भोजेवाडी, सावरगाव, उंदरखेल, धानोरा येथील तलावांनी तळ गाठला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तलावात यंदा उन्हाळ्यातही पाणीसाठा होता. यंदा पावसाळा सुरू होऊन महिना उलटला आहे. तरी आष्टी तालुक्यात मोठा पाऊस पडला नाही. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे तलावातील पाण्यानेही तळ गाठला आहे. यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.
.......
साईडपट्ट्यांची साफसफाई करण्याची मागणी
बीड : जिल्ह्यातील जवळपास सर्वच महामार्गावर साईडपट्ट्या गायब झाल्या आहेत. गावांजवळ, तर साईडपट्ट्यावर अतिक्रमण झाले आहे, तर इतर ठिकाणी मात्र पावसाने गवत उगवल्याने त्या दिसत नाहीत. तरी या साईडपट्ट्यावरील गवत जेसीबीने काढावे. जेणेकरून वाहतुकीस अडथळा येणार नाही.