अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : देवळा (ता. अंबाजोगाई) येथे वरून हिरवे तर आतून पिवळे असणाऱ्या ‘आरोही’ या रंगीत टरबुजाचे उत्पादन घेण्यात आले आहे. या रंगीत टरबुजाला परदेशातून मागणी होत आहे. ही किमया युवा शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी साधली असून, या प्रयोगातून त्यांनी दोन महिन्यात केवळ ३० गुंठे जमिनीत दीड लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. जे विकेल ते पिकेल, या धर्तीवर शेतीत नवीन उत्पादन घेतले तर निश्चितच त्याचा फायदा होतो. देवळा येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र भानुदासराव देवरवाडे यांनी नोन यू सिड्स ‘आरोही आणि विशाला’ अशा दोन प्रजातीच्या रंगीत टरबुजांचे उत्पादन घेतले. हे टरबूज वरून हिरवे आणि आतून पिवळे तर वरून पिवळे आणि आतून लाल अशा रंगाचे आहे. देवरवाडे यांनी ३० गुंठे जमिनीत ५ हजार रोपांची लागवड २४ नोव्हेंबर रोजी केली. पहिली तोड २३ जानेवारीला झाली. अवघ्या दोन महिन्यात साधारण ४ किलो ते ५ किलो वजनाचे फळ झाले आहे. ही लागवड हिवाळ्यातील असून, बदलत्या हवामानाचा कसलाही फरक या पिकावर पडला नाही. महाराष्ट्रातही उत्तम रंगीत टरबूज येऊ शकते, हे या प्रयोगातून शेतकरी देवरवाडे यांनी योग्य नियोजनातून सिद्ध केले आहे. अशा प्रयोगांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत मागणी असणाऱ्या नवनवीन वाणांद्वारे उत्तम नफा मिळवून देणारे पीक घेणे शक्य आहे. रिलायन्स मॉल, मुंबई यांनी जागेवर येऊन या टरबुजाची खरेदी केली आहे. हे टरबूज तैवान देशात लोकप्रिय असून, याला मोठ्या शहरांतही मागणी आहे. देवरवाडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्यास निश्चित यश व मोबदला मिळतो, याचे उदाहरण नव्या पिढीसमोर ठेवले आहे.