बीड : दीड वर्षांपासून घरातच असल्याने मुलांमध्ये स्थुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. टीव्हीमधला ‘मोटू’ या मुलांमध्ये अवतरत असल्याने पालकांना मुले लठ्ठ होण्याची चिंता सतावत आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे २०२० च्या मार्चपासून मुलांसाठी शाळा, मैदान, गार्डन बंद आहेत. आता तिसरी लाट मुलांसाठी धोक्याची असल्याची चर्चा असल्याने घराच्या बाहेर खेळायला जाण्यास पालक नकार दर्शवित आहेत. परिणामी, घरात एकाच जागी बसून टीव्ही पाहण्यात आणि मोबाइल खेळण्यात मुले दंग आहेत. या नादात काय खात आहेत? किती खात आहेत? याचा मेळ लागत नाही. मुलांच्या हट्टापायी त्यांना जंक फूड पुरविणाऱ्या पालकांचे प्रमाणही कमी नाही; मात्र दिवस-रात्र टीव्ही आणि मोबाइलचा सतत वापर मुले एकाच जागी बसून करीत असल्याने व संतुलित आहाराऐवजी फास्ट व जंक फूड खाण्याकडे कल वाढल्याने मुलांमध्ये स्थूलपणा वाढत आहे. जंक फूड, तेलकट आणि गोड पदार्थ वेळी-अवेळी खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मुलांचे वजन वाढत आहे.
---------
मुलांमधील वाढते वजन टाळण्यासाठी पालकांनी जंक फूड, फास्ट फूड टाळून मुलांना पूर्ण आहार वेळेच्या वेळी द्यावा. मुले मोटू बनण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यावर प्रतिबंध आवश्यक आहे. या समस्येकडे जागरूक पालक लक्ष देत असले तरी त्यांचे प्रमाण केवळ दोन टक्केच आहे. -- डॉ. गुरूप्रसाद राऊत, बीड.
--------
कोरोनामुळे मुले घरात बसून आहेत. टी.व्ही. पाहणे, मोबाइल खेळणे यामुळे बैठक वाढली आहे. दैनंदिन आहार पद्धतीत बदल होत आहे. मुलांमधील वाढते वजन भविष्यात विविध आजारांना आमंत्रण देणारे ठरू शकते. मुलांना फळे, पालेभाज्या खाण्यासाठी पालकांनी आग्रह धरावा. - डॉ. शिवाजी शेजुळ, बीड.
-----------
वजन वाढले कारण
लॉकडाऊनमुळे मुले घरातच आहेत. त्यांना शारीरिक, बौद्धिक, मानसिक कष्ट राहिलेले नाही. दोन वेळच्या आहारामध्ये अंतर ठेवले जात नसल्याने कॅलरी बर्न होत नाहीत. फळे, पालेभज्या खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. फास्ट फूड खाण्यावर भर दिला जात आहे. यात कॅलरी जास्त असतात. अनावश्यक कॅलरीजमुळे मुलांमधील वजन वाढले आहे. बसणे, झोपणे आणि खाणे वाढले.
ही घ्या काळजी
कुटुंब कोणतेही असो, खाण्याचे प्रमाण वाढले आहे. ते पचविण्यासाठी व्यायाम लागतो. त्यासाठी मुलांना घरातल्या घरात हालचाली करायला लावावी. बेकरीचे पदार्थ, जंक फूड, गोड, अतिगोड, तेलकट पदार्थ टाळावेत. मुलांच्या वेळी-अवेळी खाण्यावर प्रतिबंध घालावा. स्क्रीनटाइम कमी कसा करता येईल, यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत.
मुले टीव्ही, मोबाइल सोडतच नाहीत
कोरोनामुळे मुले घरीच आहेत. मोबाइलशिवाय अभ्यास होत नाही; परंतु अभ्यासाबरोबरच अवांतर पाहण्यात एकाच जागी बसून वेळ घालवतात. त्यामुळे बैठक वाढली आहे. मुले टीव्ही., मोबाइल सोडतच नाहीत. मुलांच्या आहारावर जागरुक पालक म्हणून आमचे लक्ष असते. त्यामुळे वजन वाढण्याची किंवा इतर आजाराची तक्रार अद्यापतरी नाही. -- सोनल जयकिशोर बियाणी, बीड.
-------------
मैदाने बंद आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल आवश्यक आहे; मात्र इतरवेळी मोबाइलवर मुले खेळत बसतात, टी. व्ही. पाहतात, जंक फूड, फास्ट फूड टाळण्याचा अनेकदा प्रयत्न करतो. त्यासाठी घरातीलच पौष्टीक व स्वादिष्ट पाककृती करून मुलांची हौस भागविण्याचा प्रयत्न केला जातो. -- पांडुरंग बरकसे, बीड.