बीड : मागील चौदा महिन्यांपासून कोरोनामुळे आजार आणि अकाली मृत्यूची अनामिक भीती वाढली आहे. माझ्या मृत्यूनंतर माझी काय इच्छा, हे नमूद करून नैसर्गिक वारसांमध्ये होणारे ताण-तणाव आणि तंटे टाळण्यासाठी मृत्युपत्र तयार करण्याचे प्रमाण मागील काही महिन्यांमध्ये वाढले आहे.
काही जण दुय्यम निबंधकांकडे नोंदणी करत आहेत, तर अनेक जण स्व-पातळीवर मृत्युपत्र तयार करत आहेत. दुय्यम निबंधकांकडे नोंदणी करण्यासाठी असलेल्या नियमांमुळे अनेक नागरिक स्वत:च मृत्युपत्र तयार करत असल्याचे दिसून आले आहे. ज्यांचे वय ७० पेक्षा जास्त व गंभीर आजार आहे, अशांनीच मृत्युपत्र करावे, असा हा नियम आहे. त्यामुळे निबंधकांकडे न जाताच स्वत:चे मृत्युपत्र साध्या कागदावर किंवा शंभर रुपयांच्या मुद्रांकावर स्वत: तयार करून आपले इच्छापत्र तयार करीत आहेत.
स्पष्ट आणि योग्य रीतीने संपत्तीचा गोषवारा नमूद करून मृत्युपत्र तयार केले जाते. नैसर्गिक वारसांव्यतिरिक्त अजून कोणाला संपत्ती द्यायची असल्यास मृत्युपत्राचे महत्त्व अधिक असते. मृत्युपत्र साध्या कागदावर केले जाऊ शकते. नोंदणी झाली नाही तरी त्याला मूल्य असते, म्हणजे कायद्याप्रमाणे नोंदणी करणे आवश्यक नाही; पण मृत्युपत्रावर कोणी शंका घेऊ नये म्हणून नोंदणीकृत करण्याकडेही अनेकांचा कल आहे.
---------
संपत्ती तसेच बँक बॅलन्स असणाऱ्या इच ॲन्ड एव्हरी... सर्वांनीच मृत्युपत्र केले पाहिजे. कुटुंबाचे नाव लागलेले असते, तेथे हिस्सा मागणारे अनेक जण तयार होतात. असे वाद न्यायालयात जाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मृत्युपत्र केल्यास खरे हक्कदार न्यायापासून वंचित राहणार नाहीत. इच्छापत्र स्वत: लिहू शकता. ते रजिस्टर्ड पोस्टाने दुय्यम निबंधक कार्यालयाला पोहोच करायचे किंवा मजकूर लिहून अथवा टाईप करून त्याचे नोटरी करून आपल्या फाईलमध्ये किंवा विश्वासू व्यक्तीकडे ठेवावे. किंवा दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करावी. - ॲड. धीरज भंडारी, बीड
---------
कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे चोहीकडे अंधार दिसत असल्याने स्वत:च्या जिवाची भीती वाटते. आपले बरे-वाईट झाले तर मुला-मुलींमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण होऊ नये तसेच संपत्ती, बँकेतील जमा रक्कम सोईस्करपणे सुलभतेने वाटली जावी या उद्देशाने अनेकजण मृत्युपत्र तयार करत आहेत. संपत्तीबाबतचे भांडण टळावे आणि कुटुंबातील एकोपा कायम राहावा, यासाठी मृत्युपत्र केले जाते. - ॲड. विजयकुमार कासट, बीड
---------------------
आई- वडिलांकडून सुलभतेने वाटणी
१) एका जोडप्याची (वय ७० पेक्षा जास्त) बीड व पुणे येथे संपत्ती होती. त्यांनी विलडीड (मृत्युपत्र) तयार करून घेतले. मोठ्या मुलाला बीड येथील संपत्ती तर लहान मुलाला पुण्यातील संपत्तीची वाटणी केली. विवाहित मुलीचे सासर सधन असल्याने व तिने या संपत्तीमध्ये हिस्सा मागू नये तसेच मुलांमध्ये बीड व पुण्याच्या संपत्तीबाबत वाद होऊ नये म्हणून हे मृत्युपत्र तयार केले.
कमी वयात मृत्यूपत्र
२) फर्म वडिलांच्या नावावर होती; परंतु मुलाने स्वत: मेहनत घेत संपत्ती व बँक बॅलन्स जमा केला. गतवर्षी कंपनीच्या कामानिमित्त परदेशात गेला. त्यानंतर कोरोनाबाधित झाला. उपचार केले. मृत्यूच्या दाढेतून परत आला. मी मृत्यू पाहून आलो, पण पुढे आपल्या कुटुंबाचे काय, पत्नी, मुले असुरक्षित वाटल्याने त्याने केलेले कष्ट व त्याच्या हिश्शातील कमविलेली संपत्तीची माहिती लिहून मृत्युपत्र तयार केले.
ग्रामीण भागात प्रमाण कमी
३) ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याकडे ९०० एकर शेती आहे. चार मुले सुशिक्षित आहेत. भाविष्यात त्यांच्यात वाद होऊ नयेत म्हणून वडिलांनी संपत्तीवाटणीची तजवीज मृत्युपत्राद्वारे तयार करून ठेवली. शहरी भागाच्या तुलनेत ग्रमीण भागात मृत्युपत्र तयार करणाऱ्यांचे प्रमाण तसे कमीच आहे.
--------------------
कमी वयाच्या लोकांमध्येही मृत्युपत्राची मानसिकता
बीड जिल्ह्यात मागील वर्षी मार्च २०२० आधी ७० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक विलडीड (मृत्युपत्र) तयार करत होते. त्याचे प्रमाणही कमीच होते. मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अनामिक भीतीपोटी संपत्ती किंवा बँक बॅलन्स असणारे ७० पेक्षा कमी वयाचे ३५ ते ५५ वयोगटातील नागरिकांमध्ये मृत्युपत्र करण्याची मानसिकता वाढली आहे. अलीकडच्या सहा महिन्यांत अशा व्यक्तींचे प्रमाण ६५ टक्क्यांपर्यंत आहे. त्याचबरोबर मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
------------