नांदुरघाट : नुकताच मान्सूनचा मृग नक्षत्राचा पहिला पाऊस जोरदार झाला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. परंतु काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी व्याजाने कर्जाने पैशाची जमवाजमव करत आहे. एवढे करूनही त्याला पाहिजे ते बियाणे मिळू शकले नाही.
बीड जिल्ह्यातील घाटाच्या वरील भागांमध्ये कापूस क्षेत्र ७० टक्के असते. कापूस पीक खर्चिक झाले. वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत. वाढत्या तेलाच्या किमती पाहून सोयाबीनकडे शेतकरी वळला. परंतु पेरणीच्या आधीच सोयाबीनचा तुटवडा झाला आहे. महामंडळाचे महाबीज सोयाबीन गायब असून यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा सवाल शेतकरी करीत आहेत. दहा टक्के शेतकऱ्यांनादेखील बियाणे मिळाले नाही. हीच संधी पाहून कंपनीने दिवसाला आपल्या बॅगवरील किमती मोठमोठ्या वाढवून बाजारात एमआरपीवर विक्री सुरू केली. शेतकरी अडचणीत होता. त्याला पेरणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कंपनीने लावलेल्या किमतीत शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. त्यामुळे बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले.
जवळपास ३७०० रुपयांना ३० किलो सोयाबीनची बॅग शेतकरी विकत घेऊ लागला. शेतकऱ्यांचे तेच बियाणे कंपनीने ४० ते ४५ रुपये किलोने घेऊन १२३ रुपये किलोने कंपनी तेच बियाणे शेतकऱ्यांना विकू लागली. तरीसुद्धा सध्या पेरणीच्या आधीच बियाणांचा तुटवडा निर्माण झाला. एकंदर कंपनीने भरमसाट लूट केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
सोयाबीन बियाणांचा कृत्रिम तुटवडा करून जी लूट चालू आहे, ती म्हणजे मढ्यावरील लोणी खाण्यासारखीच आहे. याला कृषी विभागाचे संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार आहे. त्यांच्या संगनमताने वितरकही तुटवडा निर्माण करून अवाच्या सवा दराने बियाणे विकत आहेत. आधीच कोरोनाने मारले व आता या निष्क्रिय व्यवस्थेने मारले.
- नारायण हंगे, पदाधिकारी, मनसे.