बीड : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे काढणीसाठी आलेल्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर आंबा पिकाचा मोहर गळाल्यामुळे फळधरणेवर परिणाम होणार आहे.
रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांची काढणी करण्यात आली आहे, तर अनेक ठिकाणी काढणी सुरू आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातारवण झाले असून, काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. या वातावरणामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात असून, आंब्याचा मोहर गळून पडणे, वाऱ्यामुळे कैऱ्या गळणे, तसेच भुरीसारखा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे झाडावरही परिणाम होण्याची शक्यता आहे, तर अनेक ठिकाणी ज्वारी व गव्हाची काढणी सुरू आहे, तर हरभरा काढून गंज लावून ठेवली आहे. मात्र, पाऊस आल्यानंतर या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या पिके झाकून ठेवावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया
आंबा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. इतर पिकांची काढणी सुरू आहे. काढणी झालेल्या पिकांची गंज झाकून ठेवावी, तसेच हवामानाच्या अंदाजावर शेतकऱ्यांवर लक्ष ठेवावे.
डी.जी. मुळे, अधीक्षक कृषी अधिकारी बीड