बीड : जिल्ह्यात खरीप हंगामात आतापर्यंत ८२ हजार ५२८ शेतकऱ्यांना ५०३ काेटी ३६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ३१.४६ टक्के इतके आहे. २०२१-२२ या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला १६०० कोटी रुपये कर्जपाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांकडून २० टक्के वाटप
बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंचाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युको आणि युनियन बँकेला एकूण ७५४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट्य देण्यात आलेले आहे. या बँकांनी १६ हजार ४१७ शेतकऱ्यांना १५२ कोटी ५० लाख रुपयांचे पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे. या बँकांकडे शेतकऱ्यांचे सर्वाधिक प्रस्ताव असून, उद्दिष्टपूर्तीसाठी गतीने काम करावे लागणार आहे.
व्यावसायिक बँकांचे केवळ ६ टक्के वाटप
ॲक्सिस, डीसीबी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय, कोटक महिंद्रा, आरबीएल या बँकांना एकूण २२८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ ७०० शेतकऱ्यांना १४ कोटी ६१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.
डीसीसीचे १०० टक्के वाटप
महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ४१० कोटींचे उद्दिष्ट दिलेले आहे. आतापर्यंत या बँकेने १८ हजार २६ शेतकऱ्यांना १२४ कोटी ४३ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. सध्या प्रशासक मंडळ असलेल्या या बँकेने ४७ हजार ३८५ शेतकऱ्यांना २११ कोटी ८२ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले. हे प्रमाण १०१.८४ टक्के इतके आहे. नूतनीकरणावर भर दिल्याने हा टक्का वाढल्याचे दिसून येत आहे.
-------------
२०२०-२१ खरीप व रब्बी हंगामात २ लाख २९ हजार ६५४ शेतकऱ्यांना १५४५ कोटी ३६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने या शेतकऱ्यांना तूर्त दिलासा मिळाला असून, या मुदतीत पीक कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे.
-------------