बीड : दुचाकीवरून महाविद्यालयाकडे जाणाºया दोन विद्यार्थ्यांवर ८ ते १० अज्ञातांनी तलवारीने हल्ला केला. ही घटना गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मित्र नगर परिसरात घडली. यात दोन्ही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार जुन्या भांडणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविली असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.
प्रतीक श्रीधर दोडके (१८ रा.अंकुशनगर, बीड) व उमेश अशोक पांढरे (१८ रा.गयानगर, बीड) असे जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. प्रतीक व उमेश यांचे बीड शहरातीलच माळीगल्लीतील मुलांसोबत दुचाकीचा धक्का लागल्याने वाद होते. याचे रूपांतर गुरूवारी तलवारबाजीत झाले. दुचाकीवरून तोंडाला रूमाल बांधून आलेल्या ८ ते १० तरूणांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरात दोन्ही विद्यार्थ्यांना आडविले.
येथे त्यांच्यात बाचाबाची झाली. प्रकरण वाढत असल्याचे समजताच आणि तरूणांची संख्या वाढल्याने या दोन्ही विद्यार्थ्यांनी घटनास्थळावरून पळ काढत केएसके रोड गाठला. येथे भरधाव वेगाने दुचाकीवरून आलेल्या तरूणांनी या दोघांना लाथा बुक्क्याने मारहाण केली. यातील एका तरूणाने आपल्याजवळी तलवार काढून या दोघांवर सपासप वार केले.
दोन्ही विद्यार्थ्यांनी या तरूणांच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला. हे दोन्ही विद्यार्थी पळून गेल्यानंतर हल्लेखोरांनीही घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली. जवळीलच काही लोकांनी जखमी दोन्ही विद्यार्थ्यांना वाहनातून जिल्हा रूग्णालयात दाखल केले. प्रतिकच्या पाठीवर तर उमेशच्या दोन्ही हातावर वार झाल्याने मोठी जखम झाली आहे. दोघांवरही सध्या जिल्हा रूग्णालयात वॉर्ड क्रमांक पाच मध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिसांना मिळाली उशिरा माहितीही घटना अतिशय जलद घडल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होती. जवळीलच काही लोकांनी जखमींना जिल्हा रूग्णालयात आणल्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्याला याची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी रूग्णालयात धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली. उशिरा माहिती मिळाल्याने हल्लेखोर तरूण पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
जखमींचा जवाब घेणे सुरूउपचार घेत असलेल्या दोन्ही तरूणांचा जवाब घेणे सायंकाळपर्यंत सुरू होते. हल्लेखोर कोण होते? आणि त्यांनी हल्ला का केला? हे यातून समोर येईल, असे पोलीस निरीक्षकनाना साहेब लाकाळ म्हणाले.
परिसरात भितीचे वातावरणऐन गजबजलेल्या आणि महाविद्यालय परिसरातच दुचाकीवरून आलेल्या तरूणांनी विद्यार्थ्यांवर तलवारीने हल्ला केला. त्यानंतर परिसरात व विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.