परळी : तालुक्यातील लिंबोटा येथील रहिवासी शिवराज दिवटे यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. रविवारी पहाटे 6 वाजल्यापासून परळी बीड मार्गावरील लिंबुटा (गोपीनाथगड) येथील श्री संत भगवान बाबा चौकात गावकऱ्यांनी तीन तास रस्ता रोको आंदोलन छेडले.
या आंदोलनात लिंबोटा, पांगरी, देशमुख टाकळी, कौठळी, तांडा, लिंबुटा तांडा, पांगरी तांडा या गावांतील नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गावचे मार्गदर्शक, नेते फुलचंद कराड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडले. लिंबोटा येथील शिवराज दिवटे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करावा, जलदगतीने न्याय द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
आरोपींना तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे,असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला होता. रास्ता रोको आंदोलनामुळे काही तास वाहतूक ठप्प झाली होती.