मोदी सरकार येत्या दिवाळीला डबल धमका करणार आहे. जीएसटीमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. सर्वात मोठा फायदा कार खरेदीदारांना होणार आहे. कारण छोट्या कारच्या किंमती जवळपास १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील दोन-तीन महिने ऑटो कंपन्यांचेही कार खपविता खपविता नाकीनऊ येणार आहेत. अनेकांनी जीएसटी कमी होणार हे ऐकताच कार घेण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. परंतू, एका सीएने जीएसटी कमी झाला तरी ग्राहकांना त्याचा फायदा होईल की नाही यावर शंका व्यक्त केली आहे.
जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर जरी आला तरी मध्यम वर्गीयांसाठी हा काही दिलासा देणारे नाही असे या सीएने म्हटले आहे. कपिल गुप्ता यांनी या प्रस्तावित जीएसटीचे विश्लेषण केले आहे. छोट्या कार ज्या १२०० सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या आहेत त्यांच्या जीएसटीमध्ये १० टक्के कपात होईल. तसेच ज्या मिड साईज आणि एसयुव्हीवर ४३ आणि ५० टक्के जीएसटी लागत होता तो ४० टक्के होण्याचा अंदाज आहे.
यावर गुप्ता यांनी एन्ट्री लेव्हल कारवरील जीएसटी कपातीमुळे कारच्या किंमती कमी होई शकतात परंतू मिड साईज आणि मोठ्या कारसाठी ही कपात खूपच कमी असणार आहे. हे लोक आधीपासूनच जादाचा कर आणि लाईफस्टाईल कॉस्टमध्ये भरडले गेलेले आहेत, असे म्हटले आहे. आधीच तो व्यक्ती उत्पन्नाच्या ३१ टक्के कर भरत आहे, सर्वच उत्पादनांवर जीएसटी भरत आहे, महागडे शिक्षण, औषधपाण्याचा खर्च भोगत आहे. त्याला मिड साईज एसयुव्ही खरेदी करणे म्हणजे एका कारसाठी सरकारला पैसे दिले आणि एक कार आपण ठेवली असे वाटत आहे. कारण या कारवरील कर हा ४५ ते ५० टक्क्यांवर जात आहे.
जीएसटी कमी झाला तर राज्य सरकारांचे उत्पन्न कमी होईल. आधीच इंधन, टोल आणि राज्य रस्ता कर आदी एवढे आहेत की ते ५ ते २१ टक्के आकारले जात आहेत. यामुळे जर राज्य सरकारांनी थोडाजरी कर वाढविला तरी घोडेभाडे तेच होऊन जीएसटीचा लाभ संपणार आहे. या बदलामुळे उद्योगांना फायदा होईल, परंतू मध्यमवर्गाला नाही, असा दावा गुप्ता यांनी केला आहे.