अमरावती : जिल्हा परिषदेत ठिकठिकाणी ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ या अभियानाचे फलक, कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला व पायऱ्यांवर पेंटिंग व स्टीकर लावले आहेत. अशातच गत काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे रुग्णांच्या आकडेवारी दिसून येते. अशातच झेडपीतही गत काही दिवसांपासून कोरोना संक्रमित आढळून येत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी केलेल्या उपायांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतही दिव्याखाली अंधार असल्याची प्रचिती येत आहे. जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांची ना सॅनिटायझर दिले जाते, ना थर्मल गनने तपासणी होते. कुणी विनामास्क आला तरी त्याला हटकले जात नाही. नागरिकही नियमांकडे काणाडोळा करीत कार्यालयात मुक्त संचार करत आहेत.
जिल्हा परिषद असो की अन्य शासकीय कार्यालय असोत, या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते अभ्यासगतांपर्यत सर्वांनाच तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, शारीरिक अंतर पाळणे आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांची अंमलबजावणी सुरुवातीला केली जात होती. आता या नियमांकडे पाहिजे तसे लक्ष दिले जात नसल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा फायदा तरी काय? त्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याशिवाय जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी व या ठिकाणी येणाऱ्या अभ्यागतांना कोरोनापासून बचाव करणे शक्य होऊ शकणार नाही.