मंगळवारी उघडले १३ दरवाजे : भर पावसातही पर्यटकांची गर्दी मोर्शी : मंगळवारी रात्री अप्पर वर्धा धरणाची संपूर्ण १३ दारे उघडण्यात आली होती. बुधवारी दुपारी ३ वाजतानंतर जलपातळी कमी झाल्यामुळे केवळ ७ दारे उघडी ठेवण्यात आली आहेत. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेत मंगळवार संध्याकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलपातळीत वाढ झाल्यामुळे संध्याकाळी पाच दारे उघडण्यात आली. तथापि रात्री जलपातळी पुन्हा वाढल्यामुळे रात्री १० वाजता संपूर्ण १३ दारे उघडण्यात आली होती. बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत जलपातळी कमी झाल्यामुळे सद्यस्थितीत ७ दारे २५ सेंमी इतकी उघडी ठेवण्यात आली आहेत. आॅगस्ट महिन्यात धरणाची जलपातळी ३४२.२ मीटर एवढी निर्धारित करण्यात आली असून बुधवारी ही जलपातळी ३४१.९९ मीटरपर्यंत पोहोचली आहे. दुपारी ३ वाजता २८१ घनमिटर प्रती सेकंद पाण्याचा येवा होता. पाण्याचा तेवढाच विसर्ग सात दारांमधून करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी ५२० घनमीटर इतका येवा होता. तो पुढे कमी झालेला आहे. (तालुका प्रतिनिधी)
ऊर्ध्व वर्धा जलाशय पुन्हा ‘ओव्हरफ्लो’
By admin | Updated: August 13, 2015 01:00 IST