एलआयसीधारकांची फसवणूक : फसव्या 'कॉल'चा सिलसिला सुरूचअमरावती : हॅलो सर, मी भारतीय विमा नियामक प्राधिकरण (आयआरडीए) कार्यालयातून बोलतो. आपण पॉलिसी काढली आहे काय, आपण नियमित ईएमआय भरता काय, पॉलिसी कधी मॅच्युअर झाली. असे एक ना, अनेक प्रश्न विचारून व्हॉईट कॉलर चोरटे ज्येष्ठ पॉलिसीधारकांना चुना लावत आहेत. या चोरट्यांकडून माहिती इतक्या प्रभावीपणे विचारली जाते की, पॉलिसीधारकांचा सहज विश्वास बसतो. त्यातच आयआरडीएमधून बोलत असल्याची बतावणी केल्याने पॉलिसीधारक माहिती देण्यास फारसा विचार करीत नाहीत. शहरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांना ऊत आला असून, पॉलिसीधारकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. गंडा घालणारे विमा एजंटच एखाद्या कंपनीची पॉलिसी विकण्यासाठी कंपनी देत नसलेल्या सुविधांचीही भर टाकून ग्राहकांच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करणारे विमा एजंटच ग्राहकांच्या फसवणुकीस कारणीभूत ठरत आहेत. याबाबत विमा कंपन्यांनी मौन बाळगले असले, तरी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने विमा एजंट विरोधातील तक्रारी लवादाकडे करता येणार असल्याचे सांगितले. 'वन टाईम प्रीमियम भरा व मॅच्युरिटी मिळवा', 'पॉलिसी घेतल्यावर ४५ दिवसांत खात्यात रक्कम जमा' अशा भूलथापांना बळी पडून ग्राहक भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा एजंटावर विश्वास टाकून पॉलिसी उतरवतात. महिनाभराने पॉलिसी हाती आल्यानंतर ग्राहकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. कारण विमा कंपन्या त्यांच्या धोरणात्मक कक्षेबाहेर जाऊन कोणत्याच अतिरिक्त सुविधा देत नाहीत. आयआरडीएचे ग्राहकांना आवाहनआयआरडीए ही नियंत्रक संस्था आहे. ही संस्था कधीच ग्राहकांना थेट संपर्क करीत नाही. ग्राहकांची तक्रार असेल, तर ती जाणून घेण्यासाठी आवश्यक प्रसंगी कॉल केला जातो. तसेच पॉलिसी सरेंडर केल्यानंतर किंवा त्याचा लाभ घेतल्यानंतर कंपनीचा आणि ग्राहकांचा संबंध राहत नाही. त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या कॉलला ग्राहकांनी बळी पडू नये, असे आवाहन आयआरडीएकडून करण्यात आले आहे. मवाळ भाषेचा वापरग्राहकाला आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी हे भामटे अतिशय मधाळ भाषेचा वापर करतात. एकदा का या भामट्याच्या प्रश्नांना ग्राहकांनी प्रतिसाद दिला तर त्यांना विमा क्षेत्रातील खोटी माहिती रेटून सांगितली जाते. ग्राहकांना विश्वास वाटावा म्हणून अधूनमधून इंग्रजी तथा हिंदी भाषेचाही वापर केला जातो. यापासून सावध राहणे गरजेचे आहे.हे सगळे टाळता येईलफोनवर मिळालेल्या माहितीवर विसंबून राहू नका. ती माहिती खरी आहे का हे स्वत: पडताळून पाहा. तुम्ही ती आधीची पॉलिसी ज्या कंपनीकडून, एजंटांकडून घेतली असेल त्याच्याशी संपर्क साधा. फोनवरच्या माणसावर विश्वास जरी बसला तरी त्याच्याशी प्रत्यक्षात भेटूनच नव्या पॉलिसीबाबत बोलणी करा. त्याने सांगितलेल्या पॉलिसीचा प्लॅन व्यवस्थित अभ्यासा. घाईघाईत कोणतीही पॉलिसी घेण्याचा निर्णय घेऊ नका. एखादा एजंट लवकरात लवकर अथवा एखाद्या तारखेपूर्वी पॉलिसी घेण्याची घाई करीत असेल तर खात्री बाळगा तो फसवत असेल. एक दोन भेटीतच पॉलिसी घेण्याची तयारी दर्शवू नका. सदर पॉलिसीबद्दल इतरांशी चर्चा करून मग ठरवतो असे सांगा. फसवणारे एजंट या गोष्टीने अस्वस्थ होतात आणि शक्यतो कुणालाही याबद्दल न सांगण्याची विनंती करतात. इतके सगळे होऊनदेखील पॉलिसी घेतल्यावर फसवणूक झाल्याचे, कबूल केलेले फायदे न मिळाल्याचे लक्षात येताच घेतल्यापासून १५ दिवसांपर्यंत पॉलिसी परत करण्याचा ग्राहकाचा हक्क बजवावा. ज्येष्ठांची टळली फसवणूक शहरातील बायपास रोड भागात राहणाऱ्या दोन ज्येष्ठांना गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे सतत कॉल येत आहेत. अमूक रक्कम भरा अन्यथा तुमची पॉलिसी लॅप्स होईल, अशा प्रकारची सतत बतावणी केली जात आहे. त्यातील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांनी या भामट्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर २२ हजार रुपयांचा धनादेश कुरिअरदेखील केला. मात्र, वेळीच हा सर्व प्रकार बनावट असल्याचे कळाल्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने बॅँकेत धाव घेऊन धनादेश रद्द केला. असे प्रकार सर्रास शहरात घडत असून, ज्येष्ठ नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
ज्येष्ठांना व्हॉईट कॉलर चोरट्यांचा घेरा
By admin | Updated: May 19, 2015 00:26 IST