घोषणा फसवी : १३ एप्रिलच्या निर्णयाची अंमलबजावणीच नाहीगजानन मोहोड अमरावतीराज्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या जीवित व वित्तहानी तसेच शेतीपिकांचे नुकसान यासाठी विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने १३ एप्रिल रोजी घेतला. मात्र, ४२ दिवसानंतरही या निर्णयाची अंमलबजावणी नसल्याने जिल्ह्यातील ६ हजार १२१ हेक्टर बाधित क्षेत्र मदतीपासून वंचित आहे. गतवर्षीचा खरीप हंगाम पावसाअभावी उद्ध्वस्त झाला. रबीवर शेतकऱ्यांची आशा असताना २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे हा हंगाम बाधित झाला. या वेळच्या गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे २ जण दगावले, तर १२ जण जखमी झाले. ४२ हजार ७६६ हेक्टर क्षेत्राचे ५० टक्क्यांच्या आत व ६ हजार १२१ हेक्टर क्षेत्राचे ५० टक्क्यांवर नुकसान झाले. १३ एप्रिलच्या शासन निर्णयानुसार धामणगाव, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे तालुक्यामधील शेतकऱ्यांना शासनाची सवलत व मदत अजुनही मिळालेली नाही. यावर्षीचा खरीप हंगाम दोन आठवड्यांवर आला आहे. शासकीय मदत नसल्याने बी-बियाणे, खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतपिके, फळपिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत शासन निर्णयानुसार मदत मिळणार आहे. कोरडवाहू व ओलिताखालील शेतीसाठी मदतीची किमान मर्यादा ७५० रुपये व बहुवार्षिक फळपिकांकरिता किमान मर्यादा १५०० रुपये राहणार आहे. कोरडवाहू पिकांकरिता १० हजार प्रतिहेक्टर, सिंचनाखालील पिकांकरिता १५ हजार रुपये प्रतिहेक्टर, बहुवार्षिक पिकांकरिता २५ हजार रुपये प्रतिहेक्टर, खरडून गेलेल्या जमिनीकरिता २० हजार रुपये प्रतिहेक्टर, २ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी शासनाने केली नसल्याने मदतीची घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. चार बाधित तालुक्यांत मदत केव्हा?जिल्ह्यात अवकाळी पावसाने अमरावती, धामणगाव रेल्वे, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे तालुक्यांतील ४८ हजार ८८७ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासन निर्णयाची अंमलबजावणीच झाली नसल्याने हे चार बाधित तालुके मदतीपासून वंचित राहिले आहेत.कर्जपुनर्गठन, व्याज, वीज बिल माफीचा निर्णय फसवाशासनाच्या १३ एप्रिलच्या निर्णयानुसार जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती, तीन महिन्यांच्या कालावधीमधील कर्जावरील व्याजमाफी, वीजबिल माफी, १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. ४२ दिवसांपासून अंमलबजावणी नसल्याने मदतीची घोषणा फसवी ठरली आहे. मृतांंचे वारस, जखमींना मदत केव्हा? अवकाळीने बाधित ४९६ गावांमध्ये जीवित हानीदेखील झाली आहे. भातकुली तालुक्यात वीज पडून २ व्यक्ती मृत झाल्या. दर्यापूर ते चांदूररेल्वे तालुक्यात घराची भिंत अंगावर पडून १२ व्यक्ती जखमी झाला होत्या. मृतांंच्या वारसांना व जखमींपर्यंत अंमलबजावणीअभावी मदत पोहोचलेली नाही.
अवकाळीची मदत केव्हा?
By admin | Updated: May 26, 2015 00:27 IST