फोटो - वरूड ०३ एस
डिपॉझिट भरल्यानंतर शेतकऱ्याला हेलपाटे, कार्यकारी अभियंत्याकडे केली कारवाईची मागणी
वरूड : कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी डिपॉझिट भरल्यानंतर तीन वर्षांपासून शेतकऱ्याची पायपीट सुरू आहे. तीन वर्षांनंतरही त्यांना वीज पुरवठा मिळाला नसला तरी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून १० हजारांचे बिल असल्याचे सांगण्यात आले. ते त्यांना प्राप्तदेखील झाले. या अनागोंदी कारभाराबाबत शेतकऱ्याने मोर्शी उपविभागातील कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.
तालुक्यातील ममदापूर येथील शेतकरी सुधाकर महादेव टेकोडे यांच्यावर हा प्रसंग गुदरला. ममदापूर शिवारातील गट क्र. ८४ मध्ये त्यांच्या शेतावर विहीर आहे. त्यावरून कृषिपंपाद्वारे पिकांना सिंचनाकरिता २०१६ मध्ये वीज पुरवठा घेण्याकरिता अर्ज केला होता. अर्ज मंजूर झाल्यानंतर २०१७ मध्ये अनामत रक्कमसुद्धा त्यांनी भरली. परंतु, हिवरखेड येथील महावितरण कार्यालयाकडून अद्याप त्यांच्या वीज जोडणीसाठी काहीही करण्यात आले नाही. तीन वर्षांत त्यांनी कार्यालयात वारंवार चकरा घातल्या, उंबरठे झिजविला. शेतातील पिकांचे ओलिताअभावी मोठे नुकसान झाले. अखेर सुधाकर टेकोडे यांनी मोर्शी उपविभागातील कार्यकारी अभियंता कार्यालय गाठले. यावेळी तुमचे कनेक्शन दिले असून, तुमच्याकडे १० हजार ३०० रुपयांचे बिल आहे, असे सांगून सुधाकर टेकोडे यांच्या हाती थेट बिल देण्यात आले.
तीन वर्षे होऊनसुद्धा वीज पुरवठा मिळाला नाही, मात्र थेट बिल हाती आल्याने सुधाकर टेकोडे यांना आश्चर्याचा धक्काच बसला. याबाबत चौकशी होऊन दोषीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तक्रारकर्ते शेतकरी सुधाकर टेकोडे यांनी २६ फेब्रुवारी रोजी कार्यकारी अभियंत्यांसह जिल्हाधिकारी आणि अमरावती येथील मुख्य कार्यकारी अभियंत्यांना लेखी तक्रार दिली.
-----------
बेमुदत उपोषण करणार
तीन वर्षांपासून महावितरणचे उंबरठे झिजवत आहे. वीज पुरवठा मिळण्या०वजी बिल हाती देण्यात आले. याप्रकरणी बेमुदत उपोषण छेडणार आहे.
- सुधाकर टेकोडे, ममदापूर