अमरावती : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे सन २०२०-२०२१ या वर्षातील प्रवेशित इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कला-गुणांच्या आधारे क्रीडा ग्रेस गुण देण्यात यावे, यासाठी राज्य शिक्षण मंडळाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये होण्याचे संकेत आहेत.
शासनाच्यावतीने १५, २० व २५ असे ग्रेस गुण देण्यात येते. या पद्धतीत कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी शासनाने २०१९ मध्ये झालेल्या स्पर्धांचा आढावा घेऊन केलेल्या कामगिरींचा विचार करण्यात यावा, अशी मागणी राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्यावतीने शिक्षण मंडळाकडे केली आहे. ग्रेस गुण देताना शासनाने खेळाडुंचा गत वर्षभरापूर्वीचा कामगिरीचा आढावा घ्यावा, असे पत्रात शिक्षकांनी म्हटले आहे. अमरावती विभागात दहावीचे १ लाख ६५ हजार, तर बारावीचे १ लाख ५० हजार विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून असणार आहे. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान तसेच, बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे यादरम्यान घेण्याचे नियोजन आहे.
-----------------
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांंना क्रीडा, चित्रकला ग्रेस गुणांबाबत राज्य मंडळ शासनाला कळविते. राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर ग्रेस गुण दिले जातात. अद्याप ग्रेस गुणांबाबत काहीही निर्णय आला नाही.
- शरद गोसावी, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती