मोर्शी : तालुक्यातील गणेशपूर, अडगावमार्गे खेड या २० किलोमीटर दुपदरी रस्त्याचे काम अत्यंत कासवगतीने होत असल्याने लोकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. दोन वर्षे उलटूनदेखील कामाची गती फारच कमी असल्याने २५ टक्केसुद्धा काम पूर्ण झालेले नाही.
गणेशपूर-अडगाव मार्गावर पिंपरी, दहसूर, सायवाडा, विष्णोरा, पोरगव्हाण, तळेगाव, विचोरी ही गावे असून या गावातील नागरिकांची या मार्गावरून नेहमीच वर्दळ सुरू असते. तथापि, या मार्गावरून चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अमरावती ते बैतूल हा आंतरराज्यीय मार्ग म्हणून प्रवशांकडून उपयोगात येणाऱ्या या मार्गाची दुर्दशा दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गावरील दळणवळण पाहता व अमरावती ते बैतूल कमी अंतराचा मधला मार्ग व्हावा. व या आंतरराज्यीय मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा. याकरिता आमदार आदर्श गाव योजनेचे समन्वयक दिनेश शर्मा यांनी ही मागणी रेटून धरली होती. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने या रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. या मार्गाला डिसेंबर २०१६ मध्ये तात्विक मान्यता प्रदान केली, हे विशेष. गणेशपूर ते अडगाव या मागारचे काम जलदगतीने सुरू करण्यात येऊन याच मार्गावर असलेला खेड ते खेड फाटा मार्गाचीदेखील दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.