अमरावती : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत १४ तालुक्यांतील सुमारे २ लाख ६५ हजार ९७ विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचा लाभ मिळणार आहे. शैक्षणिक सत्र २0१४-१५ येत्या २६ जूनपासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठय़पुस्तके उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने त्याची पूर्व तयारी म्हणून नुकतीच सुरु झाली आहे. यानुसार जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये शालेय पुस्तकांचे तालुकास्तरावर वितरण बालभारती मंडळ अमरावती येथे करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण उपसंचालक, राम पवार, शिक्षण उपसंचालक, पुणे महेश पालकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे, कार्यक्रम अधिकारी व्ही.आर. इंगळे, विस्तार अधिकारी मोहने, अधीक्षक गुल्हाने, अधीक्षक बालभारती पालवे तसेच पाठय़पुस्तक मंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सन २0१४-१५ या वर्षात विभागातील मोफत पुस्तकांची लाभार्थी संख्या १२ लाख ९४ हजार ५८0 एवढी आहे. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी ३ लाख ५१ हजार २३0 यवतमाळचे आहेत. तर बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ३४ हजार ७२९, अमरावती जिल्ह्यातील २ लाख ६५ हजार ९७, विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रात मोफत पाठय़पुस्तकांचा लाभ मिळणार आहे. यापाठोपाठ अकोला जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ३८७ विद्यार्थ्यांना आणि वाशीम जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार १३७ विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचा लाभ मिळणार आहे. येत्या २६ जून रोजी शालेय शैक्षणिक सत्र होणार आहे. या पार्श्वभूमीवर शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय सजावट, ध्वनिक्षेपणावरुन राष्ट्रीय भक्तीपर गीतांचे प्रसारण, शालेय प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत, लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके व गणवेश समारंभपूर्वक वितरण आणि शाळा व्यवस्थापन समितीची सभा आदी उपक्रम पार पडणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)
अडीच लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शालेय पुस्तके
By admin | Updated: May 13, 2014 23:08 IST