शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, बंदोबस्त करण्याची वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे मागणी
चांदूर रेल्वे : येथून पाच किमी अंतरावरील मांजरखेड (कसबा) व बासलापूर शिवारात वाघाची दहशत पसरली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वर्तुळ अधिकारी यांना बुधवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तालुक्यातील मांजरखेड (कसबा) व बासलापूर भागात चार ते पाच दिवसांपासून वाघाची दहशत पसरली आहे. शेतकरी अमोल अवधूतराव आखरे यांनी शेतात रात्री ८ ते १० वाजताच्या दरम्यान वाघ पाहिला तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ही सदर वाघाचे दर्शन झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भीतीमुळे शेतमजूर कामावर येत नाही. परिणामी शेतीची कामे ठप्प झाली आहेत. अशामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना जीवितहानीचाही धोका होऊ शकतो. गावालगतच हे क्षेत्र असल्याने ग्रामस्थांनाही धोका होऊ शकतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नागरिकांना दहशतमुक्त करावे, अन्यथा काही जीवितहानी झाल्यास वनविभाग जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना अमोल आखरे, मोहनप्रसाद दुबे, भारतराव आखरे, जयेंद्र दुबे, धनंजय खोंडे, दीपक बिजवे, माधव आखरे, प्रदीप घाटोळ, गुड्डू जयस्वाल, मंगेश तसरे, सचिन खोंडे, सुरेंद्र मेश्राम, विजय शिरभाते, राजू वाघ, पुंडलिक वाघ, शंकर केवट, श्याम जाधव, तारासिंह जाधव, सुधीर जाधव, अंबादास जाधव, अवधूत आखरे आदींची उपस्थिती होती.
-----------
(फोटो ओळ - चांदूर रेल्वे - वनविभागात निवेदन देण्यासाठी आलेले शेतकरी व वाघाच्या पायाच्या ठशांचे शेतातील निशाण)