गुंतवणूकदार हतबल : ‘श्री सूर्या’मधील फसवणुकीचे बळी अमरावती : सेवानिवृत्तीचा संपूर्ण रक्कम खासगी वित्तीय संस्थेमध्ये गुंतवून थोड्या अधिक फायद्याची त्यांची स्वप्ने अर्ध्यातच विरली. मग अनेकांनी मूर्खात काढले आणि त्यांची तगमग वाढत गेली व त्यातून त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यू फसवणुकीचा बळी ठरला.आज मिळेल, उद्या मिळेल, या आशेवर ते जगले. उतरत्या वयात पोलीस ठाण्याचे उंबरठेही त्यांनी झिजवले. तथापि हाती काहीही लागले नाही. उरल्यासुरल्या आयुष्याची वर्षे आता काढायची कशी? या भितीनेच त्यांचे प्राण हिरावल्या गेले. या सर्व प्रकार घडला आहे तो ‘श्री सूर्या’ नावाच्या ठगबाजा कंपनीतील गुंतवणूक व त्यानंतर झालेल्या फसवणुकीने. गेल्या काही दिवसात शंकर नगर परिसरातील तीन ज्येष्ठ नागरिक दुनिया सोडून गेले. फसवणुकीने नाडवल्या गेलेल्या या तिघांचे बळी ‘टेन्शन’पायी गेल्याचे तेथील नागरिक सांगतात. गेल्या २ वर्षांपासून श्रीसूर्यामध्ये गुंतवणूक करवून फसवणूक पदरी पडलेले पोलिसांकडे मदत आणि सहकार्याच्या अपेक्षेने पाहत आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी आकर्षक व्याज दराचे प्रलोभन दाखवत ‘श्री सूर्या’ अमरावतीत दाखल झाली. अगदी सुरुवातीलाच बिझनेस असोसिएट्स या गोंडस नावाखाली एजंट नेमण्यात आले. त्यांनी सेवानिवृत्त आणि सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या ज्येष्ठांना ठरवून ‘लक्ष्य’ केले. सेवानिवृत्तीनंतर आलेली मोठी रक्कम श्रीसूर्या मध्ये आकर्षक व्याजदर देऊन गुंतविण्यास बाध्य केले. पॅनकार्डचा अडसर नसल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल यातून झाली. लोकांच्याव गुंतणुकीतून समीर व पल्लवी जोशी या संचालकांसह बिझनेस असोसिएट्स गब्बर झालीत. काहींना सुरुवातीला मोबदलाही मिळाला. त्यानंतर २०१३ च्या मध्यवधीत श्रीसूर्या हा घसरण लागली. पैसे बुडलेत. डिसेंबर २०१३ मध्ये श्रीसूर्या विरोधात शेकडो तक्रारी झाल्या. अनेकांना अटक झाली आणि प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले. पोलिसांकडून वेळेत न्याय मिळण्याच्या अपेक्षा असल्याने अमरावतीमधील अनेक गुंतवणूकदारांनी श्वास सोडला नाही. आज ना उद्या श्री सूर्यामध्ये गुंतविलेली घामाची रक्कम मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले. जप्त संपत्तीची विल्हेवाट लावण्यासाठी प्राधिकृत अधिकारीही नेमण्यात आले. तथापि दोन वर्ष उलटून असताना रक्कम परत मिळण्याची सुतराम शक्यता न दिसल्याने अनेकांच्या टेन्शनमध्ये भर पडली. त्या संवेदनशील मनाच्या लोकांनी अखेरचा श्वास घेतला. यंत्रणेकडून न्याय न मिळाल्यास श्रीसूर्यामधील गुंतवणूकदारांमध्ये मोठा आगडोंबर मागण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर व्यक्त होत आहे. पोलीस रेकॉर्डनुसार श्रीसूर्या कंपनीने ८०० पेक्षा अधिक अमरावतीकर गुंतवणूकदारांना ६० कोटींहून अधिक रकमेने गंडविले.भविष्याच्या सुखद तरतुदीसाठी अनेकांनी मोठी रक्कम श्रीसूर्यामध्ये गुंतविली. मात्र फसवणूक झाल्यानंतर अनेकांना हा धक्का पचवता आला नाही. आणखी बळी टाळायचे असेल तर गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे. - सुनील पडोळे, सचिव, श्रीसूर्या गुंतवणूकदार संघर्ष समिती.
‘त्या’ तिघांनी घेतला अखेरचा श्वास
By admin | Updated: December 15, 2015 00:24 IST