अमरावती: नदी-नाल्यांमधून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाळू घाटावर रात्रीच्या वेळी गस्त घालण्याचे तलाठी, तहसीलदारांना आदेशित केले आहे. मात्र, हे आदेश गुंडाळून रात्रीची गस्त केवळ कागदोपत्रीच सुरू आहे. वाळू माफियांचे महसूल, पोलीस आणि आरटीओसोबत मधूर संबंध असल्यामुळे दरदिवसाला शहरात सुमारे ५०० ट्रक अवैध वाळू आणली जाते आहे. हा प्रकार राजरोस सुरू असताना त्यावर लगाम लावण्यासाठी कुणीही अधिकारी पुढे येत नाही. महसूल विभागही वाळू तस्करांवर कारवाईसाठी केवळ कागदोपत्री घोडे नाचवीत असल्याचे दिसते. वाळू व्यवसायातून कोट्यवधीची उलाढाल होते; तथापि जिल्हाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अस्सल वर्धा, कन्हान या उच्च दर्जाच्या वाळूमध्ये नाल्यांमधील निकृष्ट दर्जाची वाळू मिसळून ती ग्राहकांच्या माथी मारण्याचा गोरखधंदा देखील सुरु आहे. हा अफलातून प्रकार रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे भेसळयुक्त वाळू खरेदी करण्याखेरीज ग्राहकांजवळ कोणताही पर्याय नाही. शिवाय बांधकाम करण्यासाठी वाळू खरेदी केल्यानंतर ट्रकमधील वाळू मोजण्याचे कोणतेही एकक ग्राहकांजवळ नसल्याने ग्राहकांची शुध्द फसवणूक होत आहे. आहे. नदीतून वाळू उपस्याला बंदी असल्याचे कारण पुढे करुन वाळू माफियांनी रेतीचे दर वाढविले आहेत.
तहसीलदार,तलाठ्यांची गस्त कागदावरच
By admin | Updated: December 4, 2014 23:00 IST