अंजनगाव सुर्जी : शहरातील मुख्य रस्त्यावरील पूर्वीचे सीएफएल दिवे काढून त्या जागेवर नवीन एलएडी दिवे लावण्याचे आदेश राज्यातील सर्व नगर परिषदांना देण्यात आले होते. त्यानुसार ईईसीएल या कंपनीने अंजनगाव शहरात एलएडी पथदिवे लावले. मात्र, ते पथदिवे दिवसा सुरू अन् रात्री बंद अशी सध्याची अवस्था आहे.
विशेष म्हणजे, सदर कंपनीकडे पाच वर्षांपर्यंत एलईडी पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. ती लेखी स्वरूपात ठरली आहे. सुरुवातीला पथदिवे लागताच शहरात झगमगाट दिसत होता. परंतु, संपुर्ण शहरात पथदिवे उभारल्यानंतर केवळ आठ दिवसांतच ते पथदिवे दिवसा सुरू, तर रात्री बंद अशी स्थिती निर्माण झाली. ती परिस्थिती आजही कायम आहे. एक वर्षापासून बंद पडलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती कंपनीकडून करण्यात आलेली नाही. उलट दिवसा काही पथदिवे सुरू राहत असल्यामुळे वीज देयकाचा भार हा पालिकेच्या तिजोरीवर पडत आहे. याबाबत पालिकेकडून वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. दहा महिन्यांपूर्वीच नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनीकडून पाच लाख रुपये वसूल करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला व तसा पत्रव्यवहारसुद्धा कंपनीकडे करण्यात आला. तरीसुद्धा ईईएसएल कंपनीकडून शहरातील बंद पडलेले पथदिवे बदलवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कंपनीची चूक असताना, शहरातील नागरिकांमध्ये नगरसेवकांप्रति नाराजीचा सूर दिसून येत आहे.
पालिकेला आल्या मर्यादा
शासनाचे ध्येयधोरणानुसार नगर परिषदेला नवीन पथदिवे विकत घेण्याची मुभा नाही. त्यासाठी शासनाकडून निधीची तरतूददेखील नाही. ईईसीएलने लावलेल्या पथदिव्यांची पालिकेला दुरुस्तीदेखील करता येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांसमोर मोठा पेच उभा ठाकला आहे.