अमरावती : राज्यातून स्थानिक संस्था कर(एलबीटी) हद्दपार करण्यासाठी शासनावर दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील व्यावसायिकांनीही रणनाती आखली आहे. १ जूनपर्यंत एलबीटी न हटविल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्याविरोधात मतदान केले जाईल. एवढेच नव्हे तर केवळ १0 रूपये एलबीटीचे चालान भरून आंदोलन करणार, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. चेम्बर ऑफ अमरावती महानगर र्मचन्टस अँन्ड इंडस्ट्रिजच्या पदाधिकार्यांनी शनिवारी पत्रपरिषद घेऊन एलबीटी हटविण्यासाठी सुरू असलेल्या रणनीतीची माहिती दिली. संघटनेचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी एलबीटी हा केवळ महाराष्ट्रात सुरू असल्याचे ठामपणे सांगितले. हा कर अन्यायकारक असून याचा फटका ग्राहक आणि व्यवसायावर बसत आहे. राज्यात व्यावसायिकांकडून वेगवेगळे कर वसूल केले जात असताना एलबीटीमुळे व्यावसायिक हैराण झाले आहे. जकात कराच्या तुलनेत एलबीटीमध्ये वस्तूंचे दर अधिक प्रमाणात आकारण्यात आले आहे. ही बाब ‘फॅम’ संघटनेचे अध्यक्ष मोहन गुरूनानी यांच्यासह शेकडो व्यावसायिकांनी शासनापुढे मांडली आहे. मात्र राज्य शासनाने याविषयी कोणतीही दखल घेतली नाही. व्यावसायिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष केल्याने राज्यातील २५ महानगरपालिकांमध्ये आघाडी शासनाला लोकसभा निवडणुकीत यश मिळवता आले नाही, हे विशेष. एलबीटी हद्दपार करण्याविषयी राज्य शासनाने त्वरित निर्णय घेतला नाही तर याचे पडसाद विधानसभा निवडणुकांवर होईल, असा इशारा देण्यात आला आहे. हे आंदोलन अमरावतीतही राबविले जाणार, असे जैन यांनी सांगितले. महापालिकेचा एलबीटी विभाग करमुल्यनिर्धारणात तृट्या आढळल्यास थेट प्रतिष्ठान सील करण्याची कार्यवाही करीत असून हे नियमबाहय़ असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. एलबीटीसंदर्भात अखेरचा लढा उभारण्यासाठी २६ मे रोजी राज्यभरातील व्यावसायिकांची बैठक बोलावण्यात आली आहे. शासनाने दिलेला शब्द पाळून एलबीटी हटविण्यासाठी निर्णय घेतला नाही तर आता व्यावसायिक आरपारची लढाई लढतील, असा निर्धार केल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला सुरेश बत्रा, घनशाम राठी, अर्जुन चांदवानी, माणिकचंद लुल्ला, अशोक मंत्री, अशोक सोनी, सुदीप जैन आदी उपस्थित होते.
व्यावसायिकांची एलबीटी हटविण्यासाठी रणनीती
By admin | Updated: May 24, 2014 23:14 IST