धारणी :जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मेळघाटातील शेवटचे टोक असलेल्या धारगड व्याघ्र प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाच्या प्रक्रियेत असलेल्या केलपानी या अतिदुर्गम गावात बुधवारी मुक्काम ठोकला. त्यामुळे या भागातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी बुधवारी पूर्णवेळ मुक्कामी आढळून आले.जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळपासून संपूर्ण रात्र गावातील झोपडीत काढली. अमरावती, अकोला, बुलडाणा आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत अतिदुर्गम मेळघाटातील धारगड व्याघ्र प्रकल्पांतर्गत केलपानी हे जिल्ह्याचे शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते. येथे चारशे कुटुंबाची लोकवस्ती असून १३०० लोकसंख्येचे हे गाव आहे आहे. येथील २५० कुटुंबांचे पुनर्वसन भिलमलकापूर (अकोट)येथे केले आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत मूलभूत सोई-सुविधा पुरविल्या जात नसल्याचे गावकऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आयोजित सभेत सांगितले. पुनर्वसनासाठी पूर्ण तयारी दर्शवून त्यांच्या काही मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यांच्या मागण्यांमध्ये उर्वरित १५० कुटुंबांना दहिखेड येथे पुनर्वसित करावे, तेथे शासनाने स्वत: खर्च करून योग्य त्या मूलभूत सोई, सुविधा जसे शाळा, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आदी सुुविधा उपलब्ध करून द्याव्यात, केलपानी येथे ५० वर्षांपासून रहिवासी असलेल्या कुटुंबांना विनाअट पात्र करावे, मेळघाटातील संभाव्य नोकरभरतीमध्ये या कुटुंबांना प्रकल्पग्रस्त म्हणून प्राधान्य द्यावे, प्रकल्पग्रस्तांना एकरकमी रक्कम दिली जावी, गावातील अनाथ मुले, विधवांना देखील पुनर्वसनाचा लाभ मिळावा, शेतीच्या बदल्यात शेती आणि घरांचे मूल्यांकन करून त्याचा मोबदला शासनाने पुनर्वसनाच्या रकमेतून न देता स्वतंत्रपणे द्यावा, वनहक्क कायद्यान्वये २००७ मध्ये ठरवून दिलेली कुुटुंबनिहाय १० लाखांची रक्कम वाढवून देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी केलपानी गावातील सरपंच सीमा खांडवाये, सौदागर कांदे, नरहरी आंधळे, रमेश सोनोने, सुभाष बेठेकर, मौजीलाल जामुनकर, बिरजू मावस्कर, दिलीप कास्देकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी ठाणेदार नितीन गवारे, व्याघ्र अधिकारी नीळकंठ अलोणे, अनिल हागोणे, अळसपुरे, आनंद इंगळे यांचीही उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
अतिदुर्गम केलपानीत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
By admin | Updated: December 11, 2014 22:58 IST