अमरावती : कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ करणे आणि महिलांशी असभ्यतेचे वर्तन केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी साेमवारपासून येथील विभागीय कृषी कार्यालयासमोर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून कृषी कर्मचाऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर येथील सुरेश राजगुरे यांनी २९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कृषी कार्यालयात प्रवेश केला. प्रशासन अधिकारी यांची कुठलीही परवानगी न घेता मनीषा चौधरी यांच्याजवळ बसले. अधिकारी, कर्मचारी यांना एकेरी भाषेचा उल्लेख केला. दरम्यान, भोयर नामक कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली आणि शिवीगळ करून मारहाण केली. यावेळी कार्यालयात एकच गदारोळ झाला. मनीषा चौधरी या मदतीला धावून गेल्या. सुरेश राजगुरे हे नेहमीच माहिती अधिकारातून अनावश्यक माहिती मागतात. आर्थिकहित जोपर्यत साध्य होत नाही तापर्यत त्यांच्या तक्रारी सुरू राहतात, असे निवेदनातून म्हटले आहे. कृषी अधिकारी, कर्मचारी सध्या दहशतीत आले असून, सुरेश राजगुरे यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत लेखणीबंद सुरू राहील, असा आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. लेखणीबंद आंदोलनात कृषी अधिकारी संघटना, कृषी पर्यवेक्षक संघटना, कृषी सहायक संघटना, कृषी विभाग लिपिक संघटना, कृषी विभाग ट्रेडर्स संघटना, कृषी विभाग वाहनचालक संघटना, कृषी विभाग चतुर्थश्रेणी संघटनांचा समावेश आहे.