सात लाखांवर क्षेत्र : सोयाबीनसाठी १ लाख १५ हजार क्विंटल बियाण्यांची गरजअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख १५ हजार क्षेत्रात पेरणी होणार आहे. यासाठी एक लाख २७ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. सर्वाधिक ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन असल्याने पेरणीसाठी एक लाख १५ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. कृषी विभागाद्वारा सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी या हंगामात पेरणीक्षेत्रात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासण्याची शक्यता आहे. खरिपासाठी संकरित कापूस ३ हजार ५९१ क्विंटल, सुधारित कापूस ६० क्विंटल, तूर ४ हजार ७७६ क्विंटल, मूग एक हजार २६० क्विंटल, संकरित ज्वार २ हजार क्विंटल, उडीद २४४ क्विंटल असे एकूण १ लाख २६ हजार ६८१ क्विंटल बियाणे लागणार आहे. तालुकानिहाय आकडेवारी पाहता अमरावती तालुक्यात १२ हजार १४२ क्विंटल, भातकुली १० हजार ७१४ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर १५ हजार ६५८ क्विंटल बियाणे लागणार आहे. शेतकऱ्यांना जागरूक करण्याची गरजखरीप हंगामात सोयाबीन पेरणीपूर्वी बियाण्याला लिक्विड किंवा पावडर स्वरुपातील ‘रायझोबियम अधिक पीएसबी अधिक ट्रायकोडर्मा’ या जिवाणू खतांची व जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करणे फायदेशीर आहे. तसेच बियाणे प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये पुरसे प्रबोधन व जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघाने निवेदनातून कळविले आहे. कृषी साहित्य विक्रेता संघाची प्रतिक्रिया सोयाबीन बियाणे उगवणशक्तीबाबत अत्यंत संवेदनशील आहे. साठवणुकीच्या गोदामातील मे-जून मधील अधिक तापमान, पेरणीच्या वेळी जमिनीतील ओलावा, पेरणीची खोली, पेरणीनंतर पावसाचा ताण किंवा बियाणे दडवणारा जोराचा पाऊस याचा सोयाबीनच्या उगवणशक्तीवर परिणाम होतो. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात प्रयोगशाळेत उगवणशक्ती तपासल्यानंतर शासनाच्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे प्रमाणित बियाणे उपरोल्लेखीत घटक अनुकूल नसल्यास उगवले नाही तर जबाबदार कोण? त्यामुळे बियाणे गुणनियंत्रण विभागाने शेतकऱ्यांमध्ये यासंबंधी जागरुकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे कृषी साहित्य विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष विलास इंगोले यांनी कळविले आहे.
खरिपाच्या ५० टक्के पेरणी क्षेत्रात सोयाबीन
By admin | Updated: May 25, 2015 00:29 IST