अर्धशतकाच्या उंबरठ्यावर : लग्नसराईतील सदाबहार गीताची ‘नजाकत’अमरावती : 'बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है' हे सदाबहार गीत अर्ध शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. आजही हे गीत सुरू झाल्याशिवाय नवरदेव-नवरी लग्नमंडपात येत नाही. गाणे वाजू लागले की, प्रत्येकाला आपल्या लग्नातील अविस्मरणीय क्षण आठवल्याशिवाय राहत नाही. लाखो-करोडो रुपये खर्च केले तरीही या गाण्याशिवाय लग्नसोहळा अपूर्णच. एवढी प्रचंड लोकप्रियता या गाण्याला मिळाली आहे. याच एका गाण्याने ब्रास बँड पथकांना लाखो रुपयांची ओवाळणी मिळवून दिली आहे.भांगडा, मुंगळा, लुंगी, नागीण, अशा विविधढंगी गाण्यांवर नृत्य करीत वरात येते. मंडपात जमलेले शेकडो-वऱ्हाडी वराची प्रतीक्षा करीत असतात. बँड पथकातील मास्टर क्लेरिनेटवर 'बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है' हे गीत वाजविणे सुरू करतात व त्यांच्या पाठीमागे चालत नवरदेव व लग्नमंडपात येतो. त्यानंतर त्याच्यावर पुष्पवर्षाव होतो. त्यानंतर सुरू होतात मंगलाष्टक. हे दृश्य आपण प्रत्येक लग्नात पाहत असतो. गेल्या ४९ वर्षांपासून हे गीत लग्नसराईत वाजविले जात आहे. सदाबहार, हमेशा जवांदिल या गीताने प्रत्येकाच्या हृदयात जागा करून ठेवली आहे. या गीताला लोकप्रिय ठरविण्याचे काम ब्रास बँड पथकाने केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीने सदाबहार गीत देऊन मानवी जीवनाला समृध्द केले आहे. त्यातील एक चित्रपट 'सूरज' जो मार्च १९६६ मध्ये रुपेरी पडद्यावर झळकला होता. या चित्रपटातील 'बहारों फूल बरसाओ' हे गीत अभिनेता राजेंद्रकुमार व अभिनेत्री वैजंयतीमाला यांच्यावर चित्रीत झाले आहे. या गाण्याने अनेक विक्रम केलेत. त्यातील एक विक्रम म्हणजे गेल्या ४९ वर्षांपासून हे गीत प्रत्येक लग्नात वाजविले जात आहे. या गाण्याशिवाय लग्न लागतच नाही. गीत हसरत जयपुरी यांनी लिहिले व संगीत शंकर-जयकिशन यांनी दिले. महागायक मोहम्मद रफी यांनी हे गीत गाऊन अजरामर केले. गाण्याला लोकप्रिय केले ते बँड पथकातील कलाकारांनी. जिल्ह्यात हजारो बँड पथक आहेत. मात्र, त्यातील बोटावर मोजण्याइतके बँड पथक स्वातंत्र्यपूर्व काळापासून टिकून आहेत. १९६६ साली 'सूरज' हा हिंदी चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला आणि त्याच वर्षापासून लग्नसराईत 'बहारों फूल बरसाओ' हे गीत बँड पथक वाजवू लागले. वरात आल्यानंतर नवरदेवाला लग्नमंडपापर्यंत पोहोचवेपर्यंत' क्लेरिनेट'वर हे गाणे वाजविण्यात येते. ही प्रथाच आजतागायत सुरू आहे. या गाण्यावर वऱ्हाडी हजारो रुपयांची ओवाळणी देत असल्याने बँड पथकातील कलाकारही खुश होऊन तल्लीनतेने हे गीत वाजवत आहेत. हे गीत बँड पथकातील 'मास्टर'च्या हाती क्लेरिनेट असते. तेच हे गीत सादर करतात. अशा विविध बँड पथकातील काही ज्येष्ठ व नवीन मास्टर यांच्या प्रतिक्रियाही त्या गाण्याएवढयाच बोलक्या ठरल्या. बहारो फूल बरसाओचा रसाळपणा आजही कायम आहे. नवरदेव लग्नमंडपात येतो तेव्हा नवरी त्याची प्रतीक्षा करीत असते. स्वागत समारोह आटोपतो अन् तो बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज होतो. नेमके यावेळी गाणे वाजविले जाते. गीताने केलेले विक्रम १४ व्या फिल्म फेअर अवॉर्डमध्ये सूरज चित्रपटातीने गीतकार, संगीतकार व गायक असे तिन्ही 'नंबर वन' चे बक्षीस पटकावले होते. भारतीय सिनेमास १00 वर्षे पूर्ण झाले त्यानिमित्ताने बीबीसी एशियन नेटवर्कने आॅनलाईन सर्वे केला. त्यात १00 सुपरहिट गाण्यांची यादी करण्यात आली. त्यात 'मोहम्मद रफीने गायलेले 'बहारों फूल बरसाओ' या गाण्याला 'नंबर वन' चे स्थान मिळाले.
बहारों फूल बरसाओ...
By admin | Updated: May 31, 2015 00:12 IST