अमरावती : महाराष्ट्रातील जनतेचे ७० वर्षांचे स्वप्न साकार होत आहे. मुंबईनजीकच्या अरबी समुद्रात साकारणारे शिवछत्रपतींचे हे स्मारक जागतिक कीर्तीचे राहणार आहे. राज्यातील सर्व गडकिल्ले तसेच सर्व ७० प्रमुख नद्यांचे पाणी याठिकाणी आणले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पत्रपरिषदेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष देऊन भव्य स्मारकासाठी आवश्यक ‘ना हरकती’ तसेच पर्यावरणविषयक प्रमाणपत्र मिळविल्यानंतर स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबरला होत आहे. या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २३०० कोटींची कामे प्रस्तावित आहेत. २१० मीटरचा अश्वारूढ पुतळा अमरावती : याठिकाणी महाराजांचा २१० मीटर उंचीचा पुतळा बसविण्यात येणार आहे. स्मारकात महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कलादालन, प्रदर्शनी, गॅलरी, वाचनालय, मत्स्यालय, वॉटरस्पोर्ट आदी राहणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. या भव्यदिव्य कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. पत्रपरिषदेला जिल्हाधिकारी किरण गित्ते, अप्पर जिल्हाधिकारी खुशवंतसिंह परदेशी, भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहर प्रमुख जयंत डेहणकर उपस्थित होते. पालकमंत्री : ७० वर्षानंतर जनतेचे स्वप्न होतेय साकार हिवाळी अधिवेशनात विविध समस्या मार्गी हिवाळी अधिवेशनात अनेक समस्या निकाली निघाल्या आहेत. वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड व बेंबळातील धामक येथील प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. पुर्नवसित वसाहत ही सर्व अद्ययावत सोयींनी पूर्ण असून ती राज्यात एक आदर्श ठरेल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. महापालिकेत ८७ पैकी ५० जागा जिंकणार विकासकामांना नागरिक भरभरुन साथ देतात. शहरात भाजपाचे मोठे कार्य असल्याने ८७ पैकी किमान ५० जागा भाजप जिंकेल व महापौर देखील भाजपचाच असेल. लोकांना सहज उपलब्ध असण्याचा व तत्काळ भेटण्याचा फायदा नगर पालिका निवडणुकीत झाल्याचे पालकमंत्री म्हणाले. अडसुळांच्या आरोपाला महत्त्व नाही खा. आनंदराव अडसूळ ज्येष्ठ नेते आहेत. ते ज्या चष्म्यातून पाहतात त्यांना तसे दिसते. त्यांच्या आरोपाला आपण फारसे महत्त्व देत नाही. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होतात. परंतु जनतेचा कौल भाजपकडे आहे व जिल्ह्यात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. एक मंत्री म्हणून जनतेची कामे करणे व कर्तव्याला प्राधान्य देतो, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. नोटाबंदी हा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय ऐतिहासिक आहे, असे पालकमंत्री म्हणाले. जिल्ह्यात काळ्या पैशाची साठवणूक करणाऱ्या ज्वेलर्सवर कारवाई झाली आहे. नागरिकांनी काळ्या पैशाबाबत माहिती द्यावी, यासाठी ‘ई-मेल’ देखील जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकरी किरण गित्ते यांनी सांगितले. बेलोऱ्यातून लवकरच विमानाचे ‘टेकआॅफ’ मंत्री झाल्यानंतर वर्षभरात बेलोरा विमानतळावरुन विमानाचे ‘टेकआॅफ’ होईल, असे आश्वासन दिले होते. सर्व अडथळे पार करीत येथील कामे मार्गी लागली आहेत. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येथील कामांचे भूमिपूजन होत आहे. ही जिल्ह्यासाठी मोठी उपलब्ध असल्याचे पालकमंत्री म्हणाले. येलकीप्रकरणी तपासाच्या पोलिसांना सूचना येलकीपूर्णा येथील मुरलीधर महाराजाच्या रासलीलाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असून तपासाच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. सीडीची सत्यता तपासली जात असून याप्रकरणी तक्रारकर्ता अजून समोर आलेला नाही, असे पालकमंत्री म्हणाले.
जागतिक कीर्तीचे असणार शिवरायांचे स्मारक
By admin | Updated: December 22, 2016 00:29 IST