अमरावती : संपूर्ण अमरावती जिल्हा थंडीने गारठलाय. ग्रामीणसह शहरी भागातही हुडहुडी भरलीय. हिमालयात होणाऱ्या बर्फवृष्टीची परिणती म्हणून थंडीची ही लहर जाणवते आहे. सरत्या वर्षाच्या शेवटापर्यंत म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत ही ‘शितलहर’ कायम राहणार आहे. नवीन वर्षात मात्र तापमानात घट होईल, अशी माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली. गुरूवारी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. जम्मू काश्मिर भागामध्ये पश्चिमी विक्षेप व हिमालयात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे तापमानात घट झाली आहे. थंडी ही रबीसाठी आवश्यक असली तरी यामुळे सर्दी, खोकला, ताप, घसादुखी सारखे आजार बळावत आहेत. थंडीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी तरूणाई सज्ज झाली असून शहरातील ‘पिकनिक स्पॉट’गर्दीने फुगले आहेत. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यातही पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. ग्रामीण भागात सायंकाळ होताच शेकोट्या पेटू लागल्या असून शहरातही अनेक ठिकाणी शेकोटी भोवती बसलेले नागरिक दिसून येत आहेत. स्वेटर, शाली, उबदार दुलया आणि ब्लँकेट्सची मागणीदेखील वाढली आहे. तब्बल पंधरवाड्यापर्यंत ही हुडहुडी कायम राहणार असल्याने थंडीपासून बचावासाठी आणि थंडीचा आस्वाद घेण्यासाठीदेखील नागरिक सज्ज झाले आहेत. थंडीमुळे बळावणाऱ्या आजारांमुळे खासगी व शासकीय रूग्णालयांमध्ये रूग्णांची गर्दी दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात शीतलहर; पंधरवाडा गारठणार
By admin | Updated: December 18, 2014 22:46 IST