अमरावती : कंवरनगर परिसरातील एका दाम्पत्याच्या घरगुती वादातून वडीलांनीच तीन वर्षीय मुलाला पळवून नेले होते. त्यामुळे मुलाच्या आईने राजापेठ पोलिसांकडे साकडे घातले होते. मात्र पोलिसांच्या चौकशीला दिरंगाई झाल्याने त्या महिलेला अनेक दिवस मुलाची प्रतीक्षा करावी लागली. या घटनेचे ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच पोलीस तपासाला वेग आला. त्या महिलेचे तीन वर्षांचे बाळ लवकरच मिळाले. गहिवरुन आलेल्या त्या महिलेने लोकमतचे आभार मानले. चंद्रपूर येथील रहिवासी रोशन लवराज कोंडावार व त्यांची पत्नी रुहा हे दोघेही पती-पत्नी आपल्या तीन वर्षांच्या मुलासोबत कंवरनगर परिसरात राहत होते. मात्र घरगुती वादातून वडीलांनी २८ जानेवारी रोजी मुलाला पळवून नेल्याची तक्रार रुहा कोंडावार यांनी राजापेठ पोलिसांकडे केली होती. त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू झाल्यावर रोशन कोंडावार काही दिवस पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्यामुळे रुहा कोंडावार ही महिला मुलाच्या शोधात शहरात भटकंती करीत होती. ही बाब निदर्शनास येताच ‘लोकमत’ने हा मुद्दा उचलून धरला. वृत्ताची दखल घेत राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.एस.भगत यांनी तपासकार्यात वेग आणून दोन दिवसांतच रोशन कोंडावारला ताब्यात घेतले. रोशनजवळ असलेले तीन वर्षांचे बालक रुहा यांच्याकडे पोलिसांनी सोपविले. मुलाला बघताच आईने हंबरडा फोडला.
‘त्या’ पळविलेल्या मुलाला मिळाली आईची माया!
By admin | Updated: March 1, 2015 00:17 IST