अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढला आहे. त्यात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. बुधवारी सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ५४० झाली, तर ६७१ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३७,१२३ झालेली आहे.
जिल्ह्यात २४ तासांत २,४९६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २६.८८ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झाल्याने एकूण परिस्थिती गंभीरच आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. शहरातदेखील सर्वच परिसरात कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यातही साईनगर, राजापेठ, दस्तूरनगर, अर्जुननगर हे भाग कोरोनाचे हॉट स्पाॅट बनले आहे. या भागात एकप्रकारे ‘कम्युनिटी स्प्रेड’सारखी स्थिती निर्माण झालेली आहे.
उपचारानंतर बरे वाटल्याने बुधवारी २१९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३०,०६७ वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने हे प्रमाण सध्या ८०.९९ वर पोहोचले आहे. जानेवारी महिन्यात हेच प्रमाण ९६ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते.
बॉक्स
बुधवारी सात मृत्यू
येथील फ्रेजरपुरातील ६५ वर्षीय महिला, फुबगाव येथील ६२ वर्षीय पुरुष, अंबापेठेतील ८५ वर्षीय पुरुष, मांगीलाल प्लॉटमधील ९२ वर्षीय पुरुष, छाया कॉलनीतील ७५ वर्षीय पुरुष, तळेगाव येथील ५३ वर्षीय पुरुष, अचलपूर येथील ५७ वर्षीय पुरुषाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमित मृतांची संख्या ५४० वर पोहोचली आहे.