चांदूर रेल्वे : स्थानिक शासकीय वसतिगृह व तुळजापूर येथील निवासी आश्रमशाळेच्या नऊ सुरक्षारक्षकांना जून २०२० ते जानेवारी २०२१ असे आठ महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
कोविड-१९ च्या काळात चांदूर रेल्वे येथील शासकीय वसतिगृहामध्ये आयसोलेशन केले. त्यावेळी त्यांनी जिवाची पर्वा न करता २४ तास सेवा दिली. परंतु, त्यांच्या सेवेची कदर न करता, त्यांचे आठ महिन्याचे वेतन अदा न केल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कंपनीने १० दिवसांत थकीत वेतन व दोन वर्षाचा भविष्य निर्वाह निधी त्वरित जमा करावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहन करणार, असा इशारा सुरक्षा रक्षकांनी तहसीलदारांना निवेदनातून दिला आहे. सुरक्षा रक्षक अशोक बन्सोड, अरविंद गडलिंग, आशिष शेळके, अजय देसाई, चेतन बेलसरे, आशिष मुधोळकर, स्वप्निल माकोडे, ऋषीकेश राऊत, आकाश आरे यांनी याबाबत गुरुवारी तहसीलदारांची भेट घेतली.