चारखंबा चौकातील घटना : केबल युद्धातील जखमी युवकांचा आरोपअमरावती : गुरुवारी सायकांळी ५.३० वाजताच्या सुमारास नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारखंबा परिसरात केबल जोडणीच्या वादातून हवेत गोळीबार करुन हल्ला चढविल्याचा आरोप जखमी अब्दुल हन्नान मोहम्मद युनुस (३०, रा. छाया नगर) यांनी केला आहे. सध्या शहरात गँगवार युध्द पेटले आहे. १५ दिवसांपूर्वी शेख जफर व अहफाज खान यांच्यात टोळी युद्ध झाले. या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी शेख जफर अद्यापही फरार आहे. त्यातच चारखंबा चौकात केबल टाकण्याच्या वादातून गुरुवारी सायकांळी पुन्हा हवेत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली. शहरात दोन केबल नेटवर्क आहेत. चारखंबा चौक परिसरात जखमी अब्दुल हन्नान यांच्याकडे असणाऱ्या केबल नेटवर्कच्या वायरींग टाकण्याचे काम सुरू होते. अब्दुल हन्नान चारखंबा परिसरात केबलच्या वायरिंग करीत असताना दुसऱ्या केबल नेटवर्कच्या सदस्यांनी मनाई केली. यावेळी दोन्ही गटात झालेल्या वादातून एहजाजोद्दीन बद्रोद्दीन, नियाजद्दोन बद्रोद्दीन व कंलदरद्दोन बद्रोद्दीन यांनी अब्दुल हन्नानवर देशी कट्टयाने हवेत गोळी झाडली व कट्टा अब्दुल यांच्या कानशिलावर ठेवून धमक्या दिल्या, असा आरोप जखमी अब्दुल हन्नान याने केला आहे.
शहरात दुसऱ्यांदा गोळीबार ?
By admin | Updated: December 11, 2014 22:58 IST