पान २ ची सेकंड लीड
अंजनगाव सुर्जी : स्थानिक जुने बस स्टँड येथील वैकुंठधाम (स्मशानभूमी) ते नेहरू चौक या रस्त्याची लांबी वाढविण्यास व रुंदीकरण करण्यास प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. चार दिवसांपूर्वी आंदोलनाचा इशारा देऊन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सुर्जी पदाधिकार्यांनी ११ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण आरंभले आहे. मात्र, अदयापही पालिकेने दखल घेतली नाही.
सुर्जी येथील वैकुंठधाम ते सुर्जी नेहरू चौक हा रस्ता वाहतुकीचा आहे. या प्रमुख रस्त्यावर बस डेपो, ग्रामीण रुग्णालय, बाजार समितीकडे ये-जा करण्यासाठी वर्दळ असते. विशेष म्हणजे, नकाशामध्ये या भागात रुंद रस्ता असताना कंत्राटदार कंपनीने तीन मीटरने रस्ता कमी केला. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना येथील भाग त्या रस्त्याला चुकीच्या पद्धतीने जोडल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. त्या पार्श्वभूमीवर समता परिषद व लहरी मित्र मंडळाच्यावतीने जुना बस डेपो, वैकुंठधाम येथे उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपोषणामध्ये विपुल नाथे, विदर्भकुमार बोबडे, शिवदास यावले, परमेश्वर श्रीवास्तव व प्रवीण पटुकले यांचा समावेश आहे.
नगरपालिकेकडून दिशाभूल
नॅशनल हायवे अथॉरिटीकडे हा रस्ता असेल, तर उपोषणाचे पत्र दिल्यानंतर पालिकेने रस्त्याचे काम का सुरू केले? त्या स्थळावर फोटोसेशन करून चुकीची माहिती व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकण्यात आली. नगर परिषदेने तसे पत्रसुद्धा आम्हाला दिले. ही सरळसरळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची टीका आंदोलनकर्ते विपुल नाथे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
कोट
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत हा विषय येतो. विनाकारण कोणत्याही प्रकरणात नगरपालिकेला ओढून बदनाम करणे योग्य नाही. उर्वरित कामांसाठी आम्ही प्राधिकरणाशी संपर्क साधला.
- कमलकांत लाडोळे, नगराध्यक्ष, अंजनगाव सुर्जी