फोटो पी ०१ गव्हाणकुंड
वरूड : तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता दिवसा वीज पुरवठा मिळावा, म्हणून राज्य शासनाने गव्हाणकुंड येथे १६ मेगावॅट वीजनिर्मिती करणारा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर केला. तो प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे; परंतु या प्रकल्पाकडे जाणारा रस्ता काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अडवल्यामुळे काम बंद झाले आहे. रस्त्यात गेलेल्या जमिनीचा शासनाने मोबदला द्यावा, तोपर्यंत रस्ता बंद ठेवू, असा पवित्रा गव्हाणकुंड येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे.
या १६ मेगा वॅट वीजनिर्मिती करणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. सुमारे १६ हजार शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाकरिता जलसंपदा विभागाकडून जमीन हस्तांतरित करण्यात आली होती. आता काम अंतिम टप्प्यात असताना गव्हाणकुंड येथील काही शेतकऱ्यांनी प्रकल्पाकडे जाणारा रस्ता बंद करून आधी मोबदला द्या, नंतरच रस्ता सुरू करा, अशी भूमिका घेतल्याने सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम तूर्तास बंद पडले आहे.
कोट
गव्हाणकुंड येथील सौर ऊर्जा प्रकल्पाला जाणारा रस्ता काही शेतकऱ्यांनी अडविल्यामुळे प्रकल्पाचे काम पूर्णत: थांबले आहे. जर शेतकऱ्यांचा हक्क या रस्त्यावर असेल तर शेतकऱ्यांना शासनाने मोबदला द्यावा. तत्काळ रस्ता मोकळा करून प्रकल्प सुरू करण्यात यावा.
-अनिल बोंडे, माजी मंत्री
कोट २
सौर ऊर्जा प्रकल्पाचा जाणारा रस्ता काही शेतकऱ्यांनी अडवल्याची बाब मलादेखील सांगण्यात आली. शेतकरी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून नेमका काय प्रकार आहे, ते पाहू. बैठक घेऊन यावर तोडगा काढू.
-देवेंद्र भुयार, आमदार
-----