अमरावती : संचारबंदी लागू असताना वलगाव येथील रिचा मंगलमने विनापरवानगी लग्न समारंभाचे आयोजन केल्याबाबत गुन्हा दाखल झाला. याशिवाय वलगाव ग्रामपंचायतीमार्फत ५० हजारांचा दंड ठोठावण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी घोषित आहे. लग्न समारंभात वधू, वरासह २५ व्यक्तींना परवानगी असताना, वलगाव येथील रिचा मंगलमने विनापरवानगी लग्न समारंभाचे आयोजन केले. ७५ ते ८० व्यक्ती उपस्थित करून गर्दी गोळा केली. याप्रकरणी अमरावती तहसील कार्यालयाच्या पथकाने धाडसत्र राबविले असता, वस्तुस्थिती निदर्शनास आली. याप्रकरणी वलगाव पोलिसांत भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये दाखल करण्यात आला. मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक शंकरराव गुल्हाने यांना वलगाव ग्रामपंचायतीने ५० हजारांचा दंड आकारला. या कार्यवाहीत वलगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वाकोडे, जमादार लाेखंडे, निवासी नायब तहसीलदार जी.जी. कडू, वलगावचे मंडळ अधिकारी एम.व्ही. साव, तलाठी गावनेर, कोतवाल भूषण तसरे, ग्राम विकास अधिकारी वैद्य उपस्थित होते.