प्रमाणीकरण : मतदान केंद्रांवर राबविण्यात आली विशेष मोहीमअमरावती : राष्ट्रीय मतदार शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण कार्यक्रमांतर्गत ३ मार्च ते ३१ जुलैदरम्यान मतदार याद्या विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. १७ मे रोजी जिल्हाभरातील विविध मतदान केंद्रांवर मतदारांची नावनोंदणी, आधार कार्ड, रेशनकार्ड यांची नोंदणी करण्यात येत होती. या राष्ट्रीय कामांसाठी शिक्षक संघटनांनी प्रथम नकार दर्शविला होता. तरीही विविध शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षकांनी मतदार नोंदणीत विशेष सहभाग नोंदविला होता. मतदारांच्या मतदार छायाचित्र ओळखपत्रातील माहितीशी मतदाराचा आधार क्रमांक जोडण्यासाठी दुबार असलेली नावे कमी करण्यासाठी मतदारांच्या तपशिलात दुरूस्ती करण्यासाठी पुराव्यासह प्राप्त नमुना ८ मधील अर्जावर १५ दिवसांत निर्णय घेण्यासाठी मतदारांच्या छायाचित्रात सुधारणा करण्यासाठी मतदारांचा मोबाईल क्रमांक ई-मेल, पत्ता आदी दुरुस्तीसाठी आणि नव्याने मतदार नोंदणीसाठी शासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना नाव नोंदणीसाठी आणि चुकांची दुरूस्ती करण्यासाठी या मोहीम केंद्रावर मतदारांची गर्दी काही ठिकाणी दिसून आली. यासोबतच तहसीलदार कार्यालयातदेखील नावनोंदणी आणि दुरूस्तीचे काम राबविण्यात येत होते. या विशेष मोहिमेतून शिक्षकांना वगळण्यात यावे म्हणून काही शिक्षक संघटनांनी निवेदन देऊन याला विरोध केला होता. मात्र प्रशासनाने यावर तोडगा काढत मोहिमेला बऱ्यापैकी यश मिळविले आहे. (प्रतिनिधी)जून, जुलैमध्ये विशेष मोहीममतदार याद्या शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण करण्याची विशेष मोहीम ही चार महिन्यांत राबविण्यात येणार होती. त्यापैकी एप्रिल व मे महिन्याची मोहीम संपली आहे. आता २१ जून आणि १२ जुलै रोजी पुन्हा विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ज्या मतदारांची दोन ठिकाणी नावे असतील त्या मतदारांनी स्वत: एक नाव कमी करायचे आहे. तसेच ज्यांचे आधार क्रमांक देण्याचे बाकी आहे, त्यांनी त्याची नोंद करावी. - मोहन पातुरकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक.
मतदार नावनोंदणीला जिल्हाभरात प्रतिसाद
By admin | Updated: May 26, 2015 00:11 IST