लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : रेडिरेकनरच्या दरात १ एप्रिलपासून १० टक्के दरवाढ होत असल्याने खरेदी-विक्री व्यवहारासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होत आहे. त्यातच मार्चअखेरीस तीन दिवस सुट्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये २९, ३० व ३१ मार्च रोजी सुरू राहतील, तसे आदेश नोंदणी महानिरीक्षकांनी सोमवारी दिले आहेत.
नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य शासनाला सर्वाधिक महसूल देणारा विभाग आहे. महसूल वसुलीत हा विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागात जनतेच्या स्थावर मालमत्तांच्या दस्तांची नोंदणी केली जाते व त्याचे अभिलेख सुरक्षित केले जातात. या विभागाने मागील वर्षात ५५ हजार कोटी रुपयांचा महसूल तिजोरीत जमा केला.
२९, ३० व ३१ मार्च रोजी कार्यालये राहणार सुरू
- मार्च महिन्याच्या शेवटी २९ ते ३१ तारखेला सार्वजनिक सुट्या येत आहेत. त्यामुळे या दिवशी जनतेची गैरसोय होऊ नये व त्यांना दस्तनोंदणी सहज करता यावी.
- यासाठी नोंदणी महानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी राज्यातील सर्व नोंदणी कार्यालये २९, ३० व ३१ मार्च २०२५ रोजी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नोंदणी व मुद्रांक विभागस यंदा ६० हजार कोटींचे लक्ष्य दिले आहे.
अनेक सुट्यांच्या दिवशी या विभागातील कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले आहे. आताही सर्व अधिकारी, कर्मचारी महसूल वृद्धीसाठी सेवा देतील. नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा व आपल्या दस्तांची नोंदणी करावी.-अनिल भा. औतकर, मुद्रांक जिल्हाधिकारी, अमरावती व वाशिम