अमरावती - कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बुधवारी आ. बच्चू कडूंनी रतन इंडियात सीमोल्लंघन करीत त्रिशूल आंदोलन केले. प्रहारचे शेकडो कार्यकर्ते आणि रतनइंडिया मधील हजारो कर्मचाऱ्यांनी त्रिशूल आंदोलनामार्फत रतन इंडियाच्या अधिकाऱ्यांवर प्रहार केला. पोलिसांच्या ताफ्याला न जुमानता आ.बच्चू कडू व कार्यकर्त्यांनी कंपनी विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास सीमोल्लंघन केले.आपल्या अनोख्या आंदोलनाने प्रसिद्ध असलेले अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांना रतन इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाबद्दल निवेदन दिले होते. रतन इंडियामध्ये कार्यरत विविध विभागातील तीस कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले, वेतनवाढ करण्यात आली नाही, कर्मचाऱ्यांना मराठी बोलण्यावर बंदी, बोनस आदी महत्वाच्या मुद्द्यांवर बुधवारी रक्तदान करून त्रिशूल आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. तारामाता मंदिराजवळून निघालेला मोर्चा रतन इंडियाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहचताच पोलिसांनी अडविल्याने बच्चू कडू व पोलिसांमध्ये तू तू, मै मै झाली. वरिष्ठ उपाध्यक्ष कर्नल लोकेशसिंग यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून वादावर पडदा टाकला. रतन इंडियामधील उत्पादन मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याने नाईलाजाने कर्मचारी कपात करावी लागल्याची माहिती कर्नल लोकेशसिंग यांनी दिली. मात्र मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात बच्चू कडू आक्रमक होताच लोकेशसिंग यांनी पंधरा दिवसात कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करण्याचे आश्वासन दिले. प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना पदोन्नती, नियमानुसार वेतनवाढ, फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांना कंपनीच्या पे रोल वर तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे आश्वासनसुद्धा अधिकाऱ्यांनी दिले.यावेळी रतन इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष कर्नल लोकेशसिंग, राठी, तहसीलदार सुरेश बगळे, नायब तहसीलदार नीता लबडे, धीरज मांजरे प्रहारचे छोटू महाराज वसु, शंभू मालठाणे, तालुकाप्रमुख जोगेंद्र मोहोड, निरंजन गावंडे, परवेज सौदागर,बाला शेरकर, चंदू खेडकर, गजानन मोहोड,शाम कडू, प्रदीप वडतकर,प्रदीप गुल्हाने, प्रदीप चांगोले सह शेकडो कार्यकर्ते, रतन इंडिया चे प्रकल्प ग्रस्त कर्मचारी हजर होते. (प्रतिनिधी)
रतन इंडियात बच्चू कडुंचे सीमोल्लंघन
By admin | Updated: October 13, 2016 00:32 IST