आणखी तीन घरफोड्या : महावीरनगरात चोरट्यांचा हैदोसअमरावती : शहरात काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून या घटनांवर अंकुश ठेवण्यात आणि आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एका महिन्यात सर्वाधिक घरफोडीच्या घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. चोरीच्या आणखी तीन घटना सोमवार व मंगळवारच्या रात्री राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावीरनगरात घडल्या. चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडून ५३ हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला. मनोज मधुकर खोडे (४२), संगीता गजानन गचके (३२) व राजेश मनोहर रोंघे सर्व रा. महावीर नगर यांच्या घरी चोरीची घटना घडली. मनोज खोडे यांच्या घरी संगिता गचके या भाडेकरु आहेत. खोडे व गचके कुटुंबातील सदस्य झोपले असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील मागील दरवाजातून प्रवेश केला. चोरट्यांनी खोडे यांच्या घरातील लोखंडी पेटीतून साडेतीन ग्रॅम सोन्याचे कानातले व रोख ४ हजार रूपये आणि गचके यांच्या घरातील लोखंडी कपाटातून ८ ग्रॅम सोन्याची चेन, साडेपाच ग्रॅम सोन्याचे कानातले व २५ हजार रूपये रोख असा एकूण ४९ हजार २५० रूपयाचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा खोडे यांच्या शेजारी राहणारे राजेश रोंघे यांच्या घरी वळविला. रोंघे हे त्यांच्या कुटुंबासह बाहेरगावी गेले आहे. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दाराचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी तेथील लोखंडी कपाटातून दोन ग्रॅम सोन्याचे रिंग व दीड हजार रूपये रोख असा एकूण ४ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या तिन्ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आल्या. ही माहिती राजापेठ पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक एस. एस. भगत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
राजापेठ पोलीस ठाणे चोरट्यांचे केंद्रबिंदू
By admin | Updated: June 10, 2014 23:45 IST