रक्कम वसूल करणार ? : ‘अमृत’वर कारवाई की अभय अमरावती : महापालिकेला सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या ‘अमृत’ या संस्थेने महापालिका आणि सुरक्षारक्षकांच्या खिशावर सुमारे ४० लाख रूपयांचा डल्ला मारला आहे. ही आकडेवारी फेब्रुवारी ते आॅगस्ट या कालावधीतील असून डिसेंबरपर्यंत हिशेब धरल्यास याभ्रष्टाचारात मोठी वाढ होऊ शकते. मनपाकडून प्रतीसुरक्षारक्षक मिळणाऱ्या ८७२६ रूपयांपैकी आपण २५.६१ टक्के ईपीएफ, ६.५० टक्के इएसआयसी १५ टक्के सेवाकर आणि अन्य अधिकार म्हणून २ टक्के अशी एकत्रित कपात करीत असल्याचा ‘अमृत’चा दावा आहे. देयकासोबत हा हिशेब सामान्य प्रशासन विभागाकडे सादरही केला जातो. प्रत्यक्षात इपीएफ, ईएसआयसी आणि सेवाकर करारनाम्याप्रमाणे भरण्यातच आलेला नाही. एप्रिल ते जुलै महिन्यात ‘ईपीएफ’चा भरणा करण्यात आला नाही. फेब्रुवारी, मार्च आणि आॅगस्टमध्ये भरणा केलेल्या ईपीएफची रक्कमसुद्धा अल्प आहे. ईपीएफ, इएसआयसी आणि सेवाकर मिळून ‘अमृत’ने महापालिका व आपल्याच सहकारी सुरक्षारक्षकांना ३९ लाख ९३ हजार ३३५ रूपयांनी नाडवले आहे. ‘अमृत’ सहकारी संस्थेने आपल्याच संस्थेतील सहकाऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. फेब्रुवारी ते आॅगस्ट या सात महिन्यांच्या कालावधीत ‘अमृत’ला ११०१ सुरक्षारक्षकांच्या मानधनापोटी ९६ लाख ७३२६ रुपये अदा करण्यात आले.करारनाम्यानुसार त्यातील २५.६१ टक्के रक्कम ईपीएफ कपात करणे अनिवार्य आहे. अर्थात एकूण देयकांपैकी २४ लाख ६० हजार ४३६ रुपये ईपीएफमध्ये भरणे बंधनकारक होते. मात्र, फेब्रुवारी, मार्च, आॅगस्ट या तीन महिन्यात इपीएफपोटी केवळ ४ लाख ५० हजार ५१० रुपये भरण्यात आले आहेत. भरणा केलेली ही रक्कम २५.६१ च्या तुलनेत केवळ ८ टक्के आहे. सुरक्षारक्षकांच्या मानधनातून मात्र संपूर्ण २५.६१ टक्के रक्कम कपात करण्यात आली. अर्थात येथे २० लाख ९९२५ रुपयांचा भ्रष्टाचार केला गेला. एप्रिल ते जुलै या महिन्यात ईपीएफची रक्कम भरलेली नाही. राज्य कामगार विमा निगम अर्थात ईएसआयसीपोटी ६.५० टक्के अंशदान कपात करण्यात येईल, असे करारनाम्यात नमुद आहे. फेब्रुवारी ते आॅगस्ट या सात महिन्यात एकूण ११०१ सुरक्षारक्षकांचे मानधन देण्यात आले. ५.४२ लाखांचा अपहार अमरावती : ६.५० टक्के दराने ही कपात ६ लाख २४ हजार ४७६ रुपये होती. तेवढीच कपात सुरक्षारक्षकांच्या मानधनातून करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात फेब्रुवारीमध्ये ३३,५५८ रुपये व आॅगस्टमध्ये ४८५०९ रुपयांचा भरणा करण्यात आला. हे एकत्रित ८२ हजार ०६७ रुपये भरण्यात आले. येथे ५ लाख ४२ हजार ४०९ रूपयांचा अपहार करण्यात आला. ७ महिन्यात १,३९,९६५ रूपये आयकर कपात गेली गेली. मे आणि जूनमध्ये कपात झाली नाही, हे एक कोडेच आहे. मे आणि जूनमध्ये अधिभार कपातही केली नाही. एकूण देयकातून १,३९,९६५ रूपये आयकर व १६,७९६ रूपये अधिभार कपात करण्यात आला. या आर्थिक अनियमिततेला जबाबदार कोण हे अतिरिक्त आयुक्तांच्या अहवालाअंती स्पष्ट होणार आहे. या अहवालाकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सुरक्षा रक्षकांच्या खिशावर ४० लाखांचा डल्ला
By admin | Updated: January 3, 2017 00:09 IST