अमरावती : शेतकरीहिताच्या दृष्टीने जिल्हा परिषदेमार्फत पांदण रस्ते योजना सुरू करावी, अशा आशयाचा प्रस्ताव सोमवारी जिल्हा परिषदेच्या आमसभेत सदस्य प्रकाश साबळे यांनी मांडला. ही योजना राबविण्याची मागणी त्यांनी सभागृहात रेटून धरली.
दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्याअभावी शेतात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी रस्ते योग्य नसल्यानेही शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गतवर्षीही पावसामुळे रस्ते खराब झाले. परिणामी शेतीपिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे जिल्हा परिषदेने शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने शासना प्रमाणेच जिल्हा परिषदेमार्फत पांदण रस्ते योजना राबवावी याकरीता जिल्हा निधीमध्ये १ कोटी रूपयाची तरतूद करावी असा ठराव प्रकाश साबळे यांनी आमसभेत मांडला.यावर अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सध्या एवढी तरतूद करणे अशक्य असल्याचे सभागृहात सांगत आगामी जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये झेडपी पाणंद रस्ते योजना राबविण्याबाबत निश्चितपणे निर्णय घेतला जाईल व याकरीता आवश्यक निधीची तरतूद सुध्दा करण्याचे आश्वासन सभागृहात सदस्यांना दिले आहेत.त्यामुळे आगामी झेडपी बजेटमध्ये पाणंद रस्ते योजना राबविली जाणार आहे.