वाशिम : शहरी भागातील दारिद्रय़ावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ह्यशहरी गरीब व फेरिवाल्यांसाठी राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानह्ण १७ ऑगस्टपासून हाती घेतले असून, यामध्ये अमरावती विभागातील सहा शहरांचा समावेश आहे. विविध उपक्रमातून वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, अचलपूर व यवतमाळ शहरातील गोरगरीबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प शासनाने यानिमित्ताने सोडला आहे. बदलत्या काळानुसार मनुष्याच्या जीवनमानातही बदल होत आहेत; मात्र बदलाचे समप्रमाण नसल्याने श्रीमंत-गरीबातील दरी वाढतच आहे. ही दरी कमी करण्यासाठी शासनाकडून विविध अभियान व उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान हाती घेऊन शासनाने शहरी भागातील गरीब, बेघर व फेरीवाल्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. शहरी दारिद्रय़ाचे प्रमाण कमी करणे, शहरी गरीब कुटुंबातील व्यक्तिंना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराची संधी देणे, नागरी बेघरांना मुलभूत सेवांसह निवार्याची सुविधा देणे, फेरिवाल्यांच्या उपजिविकेसंबंधीच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे आदी उद्देश या अभियानामागे ठेवण्यात आले आहेत. अमरावती विभागातील वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, अचलपूर आणि यवतमाळ या सहा शहरांसह राज्यातील एकूण ५२ शहरांचा या अभियानात समावेश आहे. त्यासाठी एका प्राथमिक सर्वेक्षणानुसार शहरांमधील गरीब कुटुंब, फेरीवाले आणि बेघर कुटुंबांचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर बेघरांना निवारा देण्याची प्रक्रीया, कौशल्य विकास प्रशिक्षणातून गरीब कुटुंबातील व्यक्तिंना रोजगारासाठी तयार करणे, स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे आदी बाबी या अभियानातून साध्य करण्याचा शासनाचा मानस आहे. कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण, बेघरांना निवारा आणि फेरिवाल्यांवर लक्ष केंद्रीत करून शहरी दारिद्रय़ाचे प्रमाण कमी करण्याचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून शासनाने सोडला आहे.
उपजिविका अभियानातून शहरी दारिद्रय़ निर्मुलनाचा संकल्प!
By admin | Updated: August 21, 2014 22:16 IST