परतवाडा : राज्याच्या नियोजन विभागाने अचलपूर विधानसभा मतदारसंघातील पांदण रस्त्यांच्या कामांसाठी आठ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावणारा चिखलाचा त्रास कायमस्वरूपी हद्दपार होणार आहे.
अचलपूर उपविभागातील शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. निधीअभावी रस्तेच होत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्याच्या नियोजन विभागाच्या लक्षात आणून दिली. इतकेच नव्हे तर अर्ध्या वर्षापर्यंत चिखल राहणाऱ्या पांदण रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचे कसे नुकसान होत आहे, हे पटवून देण्यात ते यशस्वी ठरले. अखेर नियोजन विभागाने अचलपूर उपविभागातील पांदण रस्त्यांची कामे करण्यासाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. पालकमंत्री पांदण रस्ते योजनेंतर्गत ही कामे केली जाणार आहेत.