जिल्हाधिकारी गित्ते : संत गाडगेबाबा करिअर व्याख्यानमाला, सातत्याने परिश्रम करणे गरजेचे अमरावती : डिग्री मिळल्यानंतर परिश्रमपूर्वक स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर यश नक्कीच मिळेल, असे उद्गार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी काढले. १४ ते २१ डिसेंबरपर्यंत संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवात आयोजित संत गाडगेबाबा करिअर व्याख्यानमालेच्या चौथ्या दिवशी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले आयईएसमध्ये देशात प्रथम रँक मिळविणारा गौरव रॉय, मिशन आयएएसचे संचालक नरेशचंद्र काठोळे तसेच विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गित्ते पुढे म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची मानसिक तयारी झालेली असते असे ९० टक्के विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होतात. एमपीएससीची परीक्षा सोपी नाही. त्यासाठी खूप परिश्रम घेण्याची गरज असते. परिश्रमाची तयारी ठेवली तर यश नक्कीच मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की, अभ्यास किती वेळ केला पाहिजे. यावर मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याने दिवसातील ८ ते ९ तास दररोज अभ्यास करणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी फक्त अभ्यास करतात, त्यांनी दिवसातील १४ तास तर जे विद्यार्थी अभ्यासासोबत नोकरी करतात त्यांनी दिवसातील ९ तास अभ्यास करणे गरजेचे आहे. गित्ते पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेसाठी कोचिंग क्लासेसवर पूर्णपणे अवलंबून राहू नये. कोचिंग क्लासेस अभ्यास कसा करायचा याचे मार्गदर्शन करू शकते. पण मूळ अभ्यास स्वत:लाच करावा लागतो. ज्या विद्यार्थ्यांना यूपीएससीची तयारी करावयाची असेल त्यांनी इंग्रजीमधील पुस्तके वाचावी. बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय कठीण वाटतो. त्यांनी दैनंदिन जीवनात नेहमी इंग्रजी वृत्तपत्रे वाचावीत. अभ्यास करताना स्वत:च्या नोट्स ह्या स्वत:च तयार कराव्यात. आपण स्पर्धा परीक्षेची सर्व परीक्षा पास झालो व आपली मुलाखत जेव्हा घेण्यात येते त्याचा पाया आपणच ठरवतो. मुलाखतीत जास्तीत जास्त प्रश्न हे आपण भरून दिलेल्या फॉर्ममधलेच असतात. त्यासाठी जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो तेव्हा आपण आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचीही तयारी करणे गरजेचे आहे.आयएएसमध्ये भारतातून प्रथम रँक मिळविणारे गौरव रॉय हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी त्याचे ध्येय ठरवावे व त्याचा पाठलाग करावा. ध्येय मिळण्यासाठी वेळ लागत असेल तर खचून न जाता ध्येय मिळेपर्यंत प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रारंभी संत गाडगे महारांजाच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. संचालन प्रवीणकुमार राऊत यांनी केले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करा- यश नक्कीच मिळेल !
By admin | Updated: December 19, 2015 00:18 IST